रणरागिणी संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाणी वाटपातून सामाजिक बांधिलकी जपली
व्हिजन २४ तास न्यूज
फलटण (प्रतिनिधी) :
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत संस्थेने नागरिकांसाठी पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवून मानवतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात समानता, बंधुता व शिक्षणाची गरज यावर आपले मनोगत व्यक्त केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
यानंतर संस्थेच्या वतीने नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. इम्रान सिकंदर सय्यद, खजिनदार श्री. अतुल शाह, श्री. कैफ शेख तसेच संचालिका श्रीमती शाहीन शेख, सौ. रझिया शेख, सौ. माया बनसोडे, सौ. अनिसा सय्यद, सौ. प्रीती शाह, सौ. हिना सय्यद, सौ. मंगल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सर्व पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया प्रतिनिधी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्कृष्टरीत्या पार पडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, सदस्य व उपस्थितांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

