उंब्रज पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी: २५ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
श्रीकांत जाधव (कराड )
उंब्रज :
– सातारा जिल्ह्यातील उंब्रज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, हरवलेले एकूण २५ मोबाईल (४,७६,०००/- रुपये किंमत) शोधून नागरिकांना परत केले.
सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, उंब्रज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.
पोलीस कॉन्स्टेबल मयुर थोरात व अन्य पोलीस अंमलदार यांनी सायबर पोलीस ठाणे व C.E.I.R पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक माहिती संकलित केली. त्या आधारे सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे आणि रायगड जिल्ह्यांत शोधमोहीम राबवण्यात आली. यशस्वी प्रयत्नांमुळे २५ मोबाईल परत मिळाले आणि त्यांचे मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले
या यशस्वी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास आणि समाधान निर्माण झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र भोरे यांनी अशाच प्रकारच्या शोध मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे सांगितले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पो. उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पो. उपनिरीक्षक कोमल पाटील, पो. कॉन्स्टेबल मयुर थोरात, राजकुमार कोळी, प्रशांत पवार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे महेश पवार यांनी केली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांकडून उंब्रज पोलीस दलाचे कौतुक करण्यात येत आहे.