जीवनात खूप मोठी स्वप्न पहा. …. अक्षय महाराज भोसले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड… प्रतिनिधी

        यशस्वी होण्यासाठी जीवनात खूप मोठी स्वप्न पहा व त्यासाठी शालेय जीवनापासूनच नियोजन करा असे आवाहन युवा अभ्यासक वारकरी संप्रदाय चे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी म्हसवड येथे केले.


क्रांतिवीर इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूल म्हसवड च्या इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हसवड येथे आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा .विश्वंभर बाबर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा कीर्तनकार ,धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे राज्य अध्यक्ष अक्षय महाराज भोसले तसेच ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे याबरोबरच संस्था सचिव सुलोचना बाबऱ ,प्राचार्य राहुल फुटाणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय महाराज भोसले म्हणाले आजच्या स्पर्धेच्या जगात स्वत: कडील ज्ञानाला प्रचंड महत्त्व आहे.ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. नियमित अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन ही काळाची गरज झालेली असून त्याद्वारेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे.
पुढे बोलताना अक्षय महाराज भोसले म्हणाले आई वडील हेच तुमचे खरे देव आहेत.त्यांची स्वप्नं तुम्ही पुरी करा. गुरुजनांचा आदर ठेवा. यशस्वी व्यक्तीपासून प्रेरणा घ्या. जीवनात ध्येय निश्चिती करून त्या दृष्टीने वाटचाल ठेवा. वेळेचे नियोजन करा.जिद्द चिकाटी ठेवा.नेहमी सकारात्मक रहा.कष्ट हेच भांडवल आणि बुद्धी हीच संपत्ती याची जाणीव ठेवा.मोबाईल आणि टीव्ही पासून शक्य तो  दूर राहा. ज्या शिक्षण संस्थेने तुम्हाला घडवलं त्याची जाण ठेवा.शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगला नागरिक म्हणून शाळेला पुन्हा भेट द्या. याबरोबरच यशस्वी जीवनाचे सूत्र भोसले महाराजांनी विद्यार्थ्यांना तपशीलवारपणे स्पष्ट केले.

       माण तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण हे मूळ असून स्पर्धेच्या जगात आवश्यक असणारे सीबीएसई पॅटर्न या  शिक्षण संस्थेने सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.क्रांतिवीराच्या नावे सुरू केलेले शिक्षण संकुल सातारा जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक ठरेल असा विश्वास अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केला .संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांच्या कार्याचा गौरव करून शाळा व संस्थेची उपक्रमशीलता व गुणवत्ता पाहून भोसले यांनी या संकुलाला उज्वल भविष्य असल्याचे स्पष्ट केले.या निमित्ताने अक्षय महाराजांनी आपण कसे घडलो चा वृत्तांत स्पष्ट करून विद्यार्थीशी संवाद साधला.


यावेळी संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर,ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे,संस्था सचिव सुलोचना बाबर ,शिक्षक प्रतिनिधी सुवर्णा टाकणे, विद्यार्थी प्रतिनिधी आथर्व आडसर, गौरी पवार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्राचार्य राहुल फुटाणे यांनी केले.सूत्रसंचालन उत्कर्षा उणउणे व क्रांती दोलतडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ओंकार पिसे यांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!