प्रवचनकार सतेशकुमार माळवेंचे लोधवडे गावी संस्कार आणि समाज शिक्षणाचे प्रबोधन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले –
सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श गाव लोधवडे मधील एक ख्यातनाम समाज प्रबोधन आणि प्रवचनकार म्हणून माणदेशात अनेकांना सुपरिचित असणारे ह.भ.प. सतेशकुमार मारुती माळवे या प्राथमिक शिक्षकांनी लोधवडे गावी श्रीकृष्ण हनुमान यात्रेनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कथा अखंड हरिनाम सप्ताह्यामध्ये नुकतीच उत्तम अशी प्रवचनरुपी सेवा दिली आहे.यामध्ये त्यांनी आपल्या रसाळ आणि अमृतमय वाणीतून श्रोत्यांच्या हृदयाला प्रेमळ साद घालून सर्व श्रोते जनांची मने जिंकली.
त्यांनी आपल्या प्रवचनातून सुसंस्कार,ज्ञान,विज्ञान,अध्यात्म आणि वैश्विक शांतीमय विचारधारेचे मौलिक असे चिंतनशील विचार समाजाला दिले आहेत.नैतिकतेचे सुसंस्कारमय विचार आणि उत्तम संस्कृतीचा हा वारसा समाज घडविण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरणार आहे.त्यासाठी जगाला आज अध्यात्माची फार मोठी गरज निर्माण झाली आहे. विज्ञानाला नैतिकतेचे अधिष्ठान लाभेल ,तरच अखिल वैश्विक मानव हा सुरक्षित राहणार आहे.जर का मानवाची नैतिकताच संपुष्टात आली,तर मग मानवी समाजाचा ऱ्हास होण्यास खूप वेळही लागणार नाही.असे त्यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.
त्याकरिता ज्ञान,विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामध्ये सुसंगतपणा असला पाहिजे.या सर्व गोष्टींनेच सर्व मानवाचा विकास हा होणार आहे.तसेच आजच्या तरुण पिढीला संस्कारमय बनविण्यासाठी आपण योग्य वेळी कोणते उपाय योजले पाहिजेत.याचेही त्यांनी आपल्या प्रवचनसेवेतून चांगल्या प्रकारे प्रबोधन केले आहे.विश्वातील ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान आणि स्वरूप नेमके काय आणि कसे आहे? ईश्वरी नामस्मरण व आपले चांगले कर्म हीच खरी देवपूजा असते.मीपणाचा अहंभाव व कर्तेपणा सोडून देणे.गुरुभक्तीचा महिमा आणि आई-वडीलधाऱ्या मंडळींची सेवा, संसारिक जीवन जगत असताना परमार्थ कसा साधावा? याबद्दलचे अनेक चांगले विचार त्यांनी आपल्या प्रवचनातून विविध प्रकारचे दाखले,उदाहरणे आणि प्रमाणे देऊन उपस्थित समाजा पुढे मांडले आहेत.चांगल्या राष्ट्र व समाज निर्मिती आणि बांधणीसाठी आपणास महान अशा संत विचारांची आवश्यकता असल्याची सदभावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.त्यासाठी थोर अशा महान साधू ,संत व महंत यांच्या सात्विक सदविचारधारेची तत्त्व प्रणाली आज समाज मनावर बिंबविण्याची खरी गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी आपल्या प्रवचन सेवेतून समाजाला सांगितले आहे.

याशिवाय शिक्षणाचे जीवनातील महत्त्व,जीवनमूल्ये,वैज्ञानिक दृष्टीकोन, वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन, डिजिटल साक्षरता,जल साक्षरता, हुंडा बंदी,अंधश्रद्धा निर्मूलन,कौटुंबिक ताण-तणाव वाढण्याची कारणे, व्यसनमुक्ती, मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम,चांगली शरीर संपदा, डिजिटल स्वरुपाची सुधारित विष रहित सेंद्रिय शेती आणि तिचे तंत्रज्ञान याबद्दलच्या अनेक विषयांचे विचारधन त्यांनी आपल्या या प्रवचनातून समाजाला दिले आहेत.त्यातून एक प्रकारे समाजाला जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण असे कार्य त्यांच्या हातून घडले आहे.सध्या सर्व लोधवडे गावात ह.भ.प.सतेशकुमार माळवे यांच्या अनमोल अशा या प्रवचन सेवेची पंचक्रोशीत सर्वत्र चर्चा सुरू असून, गावातील सर्व वारकरी संप्रदयातील मंडळी आणि असंख्य ग्रामस्थ यांच्यामधून त्यांच्या या प्रवचन सेवेबद्दल अतिशय आनंद व समाधानाच्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.