२५ लाखांचे पाईप चोरीला; म्हसळा पाणीपुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह! शिवसेनेचे शहरप्रमुख विशाल सायकर यांची सीबीआय चौकशीची मागणी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसळा | प्रतिनिधी
पाभरे धरणातून म्हसळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या ४२.२९ कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी योजनेतील सुमारे २५ लाख रुपये किमतीचे २३० पाण्याचे पाईप चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण म्हसळा शहरात खळबळ उडाली असून, पाणीप्रश्नावर आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

सदर चोरीची घटना घडून दहा ते पंधरा दिवस उलटूनही म्हसळा पोलीस ठाण्याला कोणताही ठोस माग काढता आलेला नाही. या पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे म्हसळा शहरप्रमुख श्री. विशाल बाळकृष्ण सायकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी थेट सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी रायगडचे पोलीस अधीक्षक, अलिबाग यांच्याकडे केली आहे.

विशाल सायकर म्हणाले की, “म्हसळा नगरपंचायतसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. अशा मोठ्या रकमेच्या योजनेतील चोरी ही केवळ आर्थिक नुकसान नाही, तर विकास कामांना टांगणीला लावणारी गंभीर बाब आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून, जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”

योजनेचा कालावधी १८ महिने असला तरी या चोरीमुळे कामकाजात प्रचंड विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, म्हसळा शहरातील जनतेला स्वच्छ पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या प्रकाराची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि पाणीपुरवठा योजनेच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष देणे, ही वेळेची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!