“विमा असणं काळाची गरज!” — अनिल देसाई
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
विठ्ठल काटकर
कुकुडवाड | प्रतिनिधी
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अपघात, ताणतणाव, आजारपण यामध्ये झपाट्याने वाढ होत असून प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबीयांसाठी विमा संरक्षण असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केले.
कुकुडवाड येथील रवींद्र पांडुरंग काटकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उषाताई काटकर यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून विमा रकमेचा लाभ प्रदान करताना देसाई बोलत होते. यावेळी शाखेच्या शाखाधिकारी विद्या काटकर, जालिंदर खरात, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, तानाजी पुकळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले, “बँकेचे खातेदार असल्यास त्यांना बँकेतर्फे अपघाती विम्याचा लाभ मिळतो. बँक आपल्या नफ्यातून दरवर्षी २० रुपये सामान्य विम्यासाठी आणि ४३६ रुपये अपघाती विम्यासाठी भरते. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंबावर संकट येते. अशा प्रसंगी विमा रकमेचा लाभ कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरतो. काटकर कुटुंबासाठी आज विमा रक्कम ही काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.”
शाखाधिकारी विद्या काटकर यांनी उषाताई काटकर यांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पाठपुरावा केला, याबद्दल अनिल देसाई यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.
कार्यक्रमाला कुकुडवाड ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.