व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) अदनान कल्याणी पंढरपूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात सूर्यनारायणाने रौद्र रूप धारण केल्याने उष्णतेने कहर केला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, 1 ते 5 मेदरम्यान उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मार्चपासूनच तापमानात वाढ होत असून, एप्रिलमध्ये ते 40 अंशांवर पोहोचले. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तापमानात अधिकच वाढ होऊन 42 अंशांचा टप्पा पार झाला आहे. या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, घराघरात कुलर, पंखे, एसीचा वापर वाढला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडण्याचे टाळत असून, जे बाहेर पडत आहेत ते छत्री, टोपी, गॉगल आणि सनकोटचा वापर करत आहेत.
दुपारच्या वेळेत विशेषतः १२ ते ५ या वेळेत बाजारपेठा ओस पडलेल्या दिसत आहेत. उन्हाचा फटका थेट जनजीवनावर आणि व्यवसायांवरही बसत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे १२ ते ६ या वेळेत घराबाहेर पडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
उष्माघाताचे प्रमाणही वाढले असून, काही नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन सज्ज झाले असून, उपचारांची यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी कलिंगड, खरबूज, टरबूज, द्राक्ष अशा पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचे सेवन वाढवावे .