माय कशीही असो, ती मायच असते….! बाल संगोपन व पुनर्वसन केंद्र अध्यक्षा ममतादीदी सपकाळ.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज  (संपादक:अहमद मुल्ला )
गणेश मिंड 
इंदापुर (प्रतिनिधी)

          माय अडाणी, सुशिक्षित, भोळी भाळी, आंधळी-बहिरी कशीही असली तरीही ती शेवटी मायच असते, असे प्रतिपादन पुणे (मांजरी) येथील  सप्तसिंधू महिला आधार, बाल संगोपन व पुनर्वसन केंद्राच्या अध्यक्ष ममतादीदी सपकाळ यांनी केले.      अ. भा. मराठा महासंघ द्वारा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्पप्रसंगी ‘माय, ही मायच असते’ या विषयावर त्या बोलत होत्या.

         अध्यक्षस्थानी बारामती येथील वैद्यकीय सल्लागार डॉक्टर सौ. कीर्ती सतीश पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महासंघाच्या महिला संघटक सौ. सविताताई कांचन, पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.रेश्माताई ढवळे ह्या उपस्थित होत्या. प्रायोजक प्रतिनिधी म्हणून भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. मुमताज जावेद शेख, भिगवण येथील समर्थ स्टाइल्सच्या संचालिका सौ. सुषमा प्रवीण वाघ, एच पी आईस फॅक्टरी च्या संचालिका व आदर्श सरपंच सौ. हेमाताई माडगे व ओम क्रिएशन लिनन हाऊसच्या संचालिका सौ. प्रियंका संदीप  गुंदेचा उपस्थित होत्या. सपकाळ पुढे म्हणाल्या की, माझी आई गेल्यानंतर ती जेथे जेथे जाते  तेथे तेथे मी तिला शोधत असते. भिगवण बाबत तिला खूप आकर्षण होते आणि त्यामुळे ती भिगवणला बरेच वेळा येऊन गेली होती.  त्याच शोधात मला आज भिगवणला येण्याची संधी मिळाली याचा आनंद होतो.  माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत की माझ्या आईतील वैशिष्ट्य मला दिसून येतात. माझ्या जन्मानंतर सुरुवातीचे बारा वर्ष मी तिच्यापासून दूर होते त्यासंदर्भात तिच्यावर चिडले तरी सुद्धा ती त्याचे सहज हसून उत्तर देत होती. अशारीतीने आपली आई ज्येष्ठ समाजसेविका सिंधू ताई सपकाळ यांचा जीवनपट उलगडत त्यांनी आईच्या जीवनाचे महत्त्व स्पष्ट केले.

          प्रेम, स्वीकार, जाणीव, साधेपणा, कृतज्ञता इत्यादी सिंधुताईंच्या जीवनमूल्यावर आधारित आमच्या पाचही संस्था कार्यरत असून माईंचे हे कार्य सतत चालू ठेवण्याचा निश्चय त्यांनी यावेळी प्रकट केला. माई ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणी लेकरांसाठी पदराची जोडी करून मदत गोळा करत होती, परंतु आज इंटरनेटची दुनिया आहे. आजच्या परिस्थितीनुसार मला झोळी करणे शक्य नसले तरी माईंच्या म्हणण्यानुसार आपण सर्व या मुलांचे गणगोत आहात हे लक्षात ठेवून मदतीचा हात सदैव असू द्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

       अ. भा. मराठा महासंघ भिगवण शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येत असलेला ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ यावेळी भिगवण येथील सौ जया नितीन साखरे यांना देण्यात आला. त्या  पुरस्काराचे वित्त वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पुणे येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सौ. रेश्माताई महेश ढवळे यांचे वतीने वाचनीय असे १०१ महत्वपूर्ण ग्रंथ सार्वजनिक शिवराय वाचनालयाकरिता भेट म्हणून देण्यात आले. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महासंघाच्या वतीने सौ. छाया प्रकाश ढवळे, सौ. तृप्ती पराग जाधव, सौ. रोहिणी छगनराव वाळके, सौ. महादेवी उमेश दिडवळ, सौ. संगीता केशव भापकर व सौ. राणी किरण लंगोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता साळुंखे यांनी तर प्रायोजकांची यथोगाथा व सन्मानपत्र वाचन डॉ. सौ. प्राची थोरात यांनी केले. पांडुरंग वाघ यांनी सादर केलेल्या वंदे मातरम नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!