प्रहारच्या मुस्लिम अल्पसंख्याक विभागाच्या माण तालुका अध्यक्षपदी शब्बीर काझी यांची निवड
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड दि. ( प्रतिनिधी)-
प्रहार जनशक्ति पक्षाच्या मुस्लिम अल्पसंख्याक विभागाच्या माण तालुका अध्यक्षपदी येथील शब्बीर हिदायतुल्ला काझी त्यांची निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना सदर निवडीचे पत्र प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपला पक्ष हा आगामी विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे सांगत सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा निवडणुक तर आमचा पक्ष १०० टक्के लढणार असल्याचे स्पष्ट केले होते तर याठिकाणी आगामी निवडणुकीत प्रहार चा आमदार निवडुन येईल असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले होते.
दरम्यान आ. बच्चू कडु यांनी केलेल्या विधानामुळे माण – खटावचे संभाव्य उमेदवार असलेले जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे हे चांगलेच एक्शन मोडवर आले असुन त्यांनी या मतदार संघात मोर्चेबांधणीला चांगलीच सुरुवात केली आहे, गत आठवड्यात पिसे यांनी खटाव तालुक्यातील काही युवकांचा प्रहार पक्षात प्रवेश घेत त्यांच्यावर विशिष्ट जबाबदारी सोपवली आहे. तर म्हसवड येथील काझी यांची ही निवडही याचाच एक भाग आहे.
अरविंद पिसे हे गत ५ वर्षांपासुन आ. बच्चू कडु यांच्या सोबत कार्यरत आहेत पिसे यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातुन माण व खटाव या दोन्ही तालुक्यातील दिव्यांगाना शासकीय सर्व योजनांचा लाभ मिळवुन देण्याचे मोठे काम केले आहे, याशिवाय माण, खटावमधील सर्व सामान्य मजुर वर्ग, निराधार व्यक्ती, महिला, परितक्त्या आदींसाठी पिसे हे गत ५ वर्षापासुन अविरतपणे काम करीत आहेत. पिसे यांच्या सामाजिक कार्याचा म्हसवड शहरातील गोर गरीब जनतेला मोठा फायदा होत आहे. म्हसवड सारख्या ग्रामीण शहरात त्यांनी सर्वसामान्य मोलमजुरी करुन जगणाऱ्या वर्गाला हक्काची घरे मिळवुन देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबवत सुमारे साडे चारशे घरे बांधुन ती या वर्गाला उपलब्ध करुन दिली आहेत त्यांचे अशाप्रकारचे काम सर्वत्र सुरु आहे. पिसे यांनी आजवर केलेल्या सर्वसामान्यांच्या कामांमुळे सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसुन येते तर आगामी विधानसभा निवडणुकीत ही प्रहारच्या वतीने अरविंद पिसे हेच संभाव्य उमेदवार म्हणुन रिंगणात उतरतील अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असल्याने सामान्य जनता त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार असुन यामध्ये वरील लाभार्थी अग्रस्थानी राहतील एवढे नक्की. दरम्यान शब्बीर काझी यांच्या सदर निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे