रंजल्या गांजलेल्यांना केलेली मदत हिच खरी भक्ती होय-अभिजीत जगताप* गणेशोत्सवाच्या वर्गणीतून आश्रमातील निराधारांना मिष्ठान्न वाटप
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले
भारतीय संस्कृतीत अन्नदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून,भुकेलेल्यांला अन्न,तहानलेल्यांना पाणी आणि रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे यामध्येच खऱ्या अर्थाने भक्तीभाव दडला आहे.गाडगेबाबांनी जपलेला हा मुलमंत्र अखंड मानव जातीच्या कल्याणाचा मुळमार्ग असल्याचे मत प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा येथील सेवक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिजित जगताप यांनी व्यक्त केले.
पानवण ता.माण येथील निराधार निराश्रित विद्यार्थ्यांच्या श्री.गजानन आश्रमात प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा येथील सेवक गणेशोत्सव मंडळाकडून राबविण्यात आलेल्या अन्नदान या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या सामुदायिक मिष्ठान्न भोजनसमयी ते बोलत होते.याप्रसंगी आश्रमच्या संचालिका रमाताई तोरणे,जिल्हा शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष विजय बनसोडे,स्वप्नील बोराटे,अमित जाधव,शुभम शिंगटे, सूर्यकांत गवरे,सोमनाथ कदम,काशिनाथ तोरणे,कासलिंग दोलताडे,आनंदा जमाले,अनिल काळेल,सुंदरराव पैठणे,सुरेश खांडेकर,पिंटू पोरे,उमाकांत तोरणे,पवन तोरणे,महेश तोरणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या निमित्ताने डॉल्बी डीजेतील मिरवणूका,ढोल ताश्यांचा कडकडाट,पर्यावरणास हानिकारक असलेली फटाक्यांची आतषबाजी यासह इतरत्र होणाऱ्या अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन सेवक गणेशोत्सव मंडळातील सर्व सभासद,ठेवीदार व सेवक वर्गांनी यंदा भुकेलेल्यांना अन्नदान,गरजूंना मदत,महिलांच्या करमणुकीसाठी खेळ पैठणीचा,तसेच हसण्यासाठी जीवन आपले आदी समाजोपयोगी कार्यक्रमावर भर दिल्याने,जिल्ह्यातील इतर गणेशोत्सव मंडळांसाठी ही एक प्रेरणादायी बाब ठरली आहे.पानवण येथील निराधार निराश्रित मुलांना आपुलकीने मिष्ठान्न भोजन दिल्याने,चिमुकल्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी आश्रमच्या संचालिका रमाताई तोरणे यांनी आश्रमातील आवश्यक असलेल्या सोलर दुरुस्तीसह इतर बाबींचा लेखाजोखा उपस्थित मान्यवरांच्या समोर मांडला.यावेळी म्हसवड बिट परिसरातील शिक्षक वर्गासह ग्रामस्थ उपस्थित होते.
छाया अन्नदान करताना शिक्षक बॅकेतील सेवक