नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या, माण शिवसेनेची पालकमंत्र्याकडे मागणी..
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड.. प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे शेतातील विविध पिकाचे झालेले नुकसान तसेच म्हसवड शहरात व्यापाऱ्यांच्या भिजलेल्या मालाचे झालेले नुकसान याबाबत सुयोग्य पंचनामे करून त्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी माण तालुका शिवसेनेतर्फे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.
माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई म्हसवड येथे आले होते. यावेळी माण तालुका व म्हसवड शहर शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री देसाई यांना शेतीविषयक तसेच व्यवसायिकांच्या नुकसानी बाबत तातडीने व सरसकट स्वरूपात नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले.
शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर , शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलानी, म्हसवड शहराध्यक्ष वैभव गुरव, तालुका उपमुख पंत मंडले, तालुका युवा प्रमुख हनुमंत राजगे, उपप्रमुख अनिल मासाळ यांचे सह सुभाष काळुंगे अंकुश नलवडे इत्यादी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
माण तालुक्यातील अनेक गावात नगदी पिक कांदा, मका,बाजरी, कोबी तसेच भाजीपाल्याची विविध पिके , डाळिंब , द्राक्ष,केळी यासह मूग, उडीद इत्यादी पिकाचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला सुद्धा कोंब फुटलेले आहेत. अतिवृष्टीने शेती पिकाचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट दिवाळीपूर्वी देण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, तसेच बाधित व्यापारी वर्गांना , तसेच पडझड झालेल्या घर लाभार्थींना शासन वाऱ्यावर सोडणार नसल्याचे नामदार देसाई यांनी स्पष्ट केले. शेती पिकाबरोबरच म्हसवड येथे बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची ही पाहणी पालकमंत्री यांनी केली. प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत मिळणे कामे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

