“जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी म्हणूनच आज मंत्री झालो” – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड | प्रतिनिधी
“मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होतो म्हणूनच आज मंत्री झालो आहे,” असे गौरवोद्गार ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे यांनी वीरकरवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
दिनांक १६ जून रोजी नामदार गोरे यांच्या हस्ते वीरकरवाडी येथील आदर्श शाळेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. शाळेतील आधुनिक पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती, स्वच्छ व सुंदर परिसर यांची पाहणी करताना त्यांनी समाधान व्यक्त केले.
ते म्हणाले, “अशा शाळांमधून नक्कीच गुणवत्तापूर्ण व सुसंस्कारित विद्यार्थी घडतील. शिक्षकांनी मनापासून शिक्षण देण्याची गरज आहे. हे विद्यार्थीच पुढे जाऊन समाजाचा आधारस्तंभ बनतील.”
या प्रसंगी इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नामदार गोरे यांच्या हस्ते त्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व बूट यांचे वाटपही करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वर्गात जाऊन इंट्रॅक्टिव्ह बोर्ड, संगणक यंत्रणा व इतर आधुनिक शिक्षणसुविधांची पाहणी केली.
कार्यक्रमास श्री. सिद्ध साहेब (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा), श्री. अनिस नाईकवडी (शिक्षणाधिकारी योजना), गटविकास अधिकारी श्री. प्रदीप शेंडगे, अति. गटविकास अधिकारी श्री. खाडे, गटशिक्षणाधिकारी श्री. लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख श्री. दीपक कुमार पतंगे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका अनिता तोरणे, शिक्षक किरण बोराटे, पल्लवी जगताप, शुभांगी रणदिवे, पुनम शेंडे, तानाजी बुरले यांचा कार्यक्रम आयोजनात मोलाचा सहभाग होता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल वीरकर व सर्व सदस्यांसह वीरकरवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.