पत्रकारीतेमध्ये ध्येय महत्वाचे – मुख्याधिकारी डॉ. सचिन माने |
म्हसवड दि. ७ ( महेश कांबळे )
पुर्वीची पत्रकारिता अन सध्याची पत्रकारीता यामध्ये आता खुपच बदल झाला आहे, सध्याचा काळ हा डिजीटल काळ म्हणुन ओळखला जात असल्याने प्रसार माध्यमेही डिजीटल झाली आहेत, असे असले तरी पत्रकारिता करताना प्रत्येक पत्रकाराने समाजहिताचे ध्येय मनामध्ये ठेवुन पत्रकारिता केल्याने समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा, भ्रष्टाचारावर निश्चीतपणे आळा बसतो, पत्रकार हा नेहमीच जागरुक असल्याने अनेकांना त्यांची धास्ती वाटते, मात्र पत्रकारांची ही धास्ती कायम राहण्यासाठी पत्रकारांनीही समाजहिताचे ध्येय मना मध्ये ठेवुन पत्रकारिता करावी तरच असे पत्रकार त्यांचे अंतिम ध्येय निश्चीतपणे गाठतील असा विश्वास म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी व्यक्त केला.
म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी जेष्ट पत्रकार दिलीप किर्तने, अजित काटकर, एल. के. सरतापे, महेश कांबळे, अहमद मुल्ला, नागेश डोंबे, शंकर पानसांडे, सिध्दार्थ सरतापे, लुनेश विरकर, शंकर डमकले, सागर सरतापे आदी उपस्थित होते, पुढे बोलताना मुख्याधिकारी डॉ. माने म्हणाले की आज बहुतांशी मुदत संपलेल्या पालिकेत प्रशासक म्हणुन मुख्याधिकारी काम करीत आहेत, प्रशासन म्हणुन काम करीत असताना आम्ही कोठे चुकत असल्यास पत्रकारांनी ती चुक वेळीच प्रशासनाच्या लक्षात आणुन दिल्यास चुकीचे काम होणार नाही याशिवाय शासनाचा व प्रशासनाचा वेळ अन पैसा ही वाया जाणार नाही, पत्रकारांनी समाजहिताच्या बातम्या देताना लोकांच्या अडचणी जरुर मांडाव्यात त्याबरोबरच विकासाच्या आड येणाऱ्या व प्रशासनाला अडचणीत आणणाऱ्याचा बुरखाही फाडण्याचे काम करावे, मी स्वत:ला भाग्यकारी समजतो की येथील सर्वच पत्रकार हे नेहमी नाण्याच्या दोन्ही बाजु मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. पत्रकारांनी नेहमीच घटनेच्या दोन्ही बाजु मांडण्याचा प्रयत्न केल्याने एखाद्या घटनेच्या दुसऱ्या बाजुची माहिती सर्वांसमोर येवु शकते त्यामुळे सत्य उजेडात येण्यास मदत होईल असे ही शेवटी डॉ. माने म्हणाले.
यावेळी जेष्ठ पत्रकार अजित काटकर यांनी बदलत्या पत्रकारितेचे स्वरुप मांडताना पत्रकारांना येत असलेल्या अडचणी बद्दल शासनाने व प्रशासनानेही पत्रकारांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करीत प्रशासकीय अधिकार्यांनीही पत्रकारांना विशिष्ट चष्म्यातुन न पाहता पत्रकार हा सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणुन आपल्याला काही विचारत आहे त्यांच्या शंकेचे समाधान म्हणजेच सामान्य जनतेच्या प्रश्नाचे समाधान आहे याचा विचार करुन त्यांना योग्य ती माहिती द्यावी, तर चांगल्याला नेहमी चांगले तर चुकीला नेहमी चुकच म्हणण्याची धमक माणच्या सर्व पत्रकारांमध्ये असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पत्रकार महेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार सागर सरतापे यांनी मानले.