” ‘राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम तर करतेच त्याबरोबर दत्तक गाव योजनेद्वारे गावच्या विकासाला गतीही देते. गावच्या विकासाला चालना देण्याचे काम स्वयंसेवकाच्या हातून होणे हेच दत्तक गाव योजनेचे उद्दिष्ट आहे. स्वयंसेवक गावाकडून वैचारिक भान घेत असतात तर गाव स्वयंसेवकाच्या श्रमातून आपले रूप पालटत असते.'” असे प्रतिपादन मा. प्रा. सुभाष कांबळे (भूगोल विभाग प्रमुख, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड ) यांनी केले. ते मौजे किवळ येथे आयोजित केलेल्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या सिनिअर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” प्रबोधनपर कार्यक्रमात ‘राष्ट्रीय सेवा योजना आणि दत्तक गाव’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री प्रल्हाद बाबुराव जाधव हे होते. ते म्हणाले की, ” राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच आदर्श नागरिक घडून गावाचा विकास करण्याचे बळ मिळते. .”
प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री चंद्रकांत माने, मा. श्री जयवंत पवार , मा. श्री. सुहास साळुंखे, मा. श्रीमती शारदा नळगुणे, मा. श्री. संदीप चव्हाण, मा. श्रीमती विमल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व एन .एस. एस गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. पी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. अनुराधा चव्हाण हिने करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. धनश्री लोहार हिने केले व सूत्रसंचालन कु. स्नेहल बोडरे हिने केले. या शिबिराच्या समारंभास वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे सर्व स्वयंसेवक तसेच मौजे किवळ येथील ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.