माण तालुक्यात कृत्रिम पावसाची गरज. ….प्रा. विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
माण तालुक्यात पावसाने प्रचंड ओढ दिली असून बळीराजाला दिलासा देण्यासाठी माण तालुक्यात कृत्रिम पाऊस उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन किसान काँग्रेस पुणे विभाग उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी व्यक्त केले.
माण तालुका हा खरिपाचा तालुका होय.बाजरी सह कडधान्य इत्यादी पिकाची खरिपामध्ये येथील शेतकऱ्याकडून पेरणी केली जाते.तर नगदी पीक म्हणून हळव्या कांद्याची पाण्याच्या उपलब्धतेनुसार मोठ्या प्रमाणात केला जाते. गेल्या तीन वर्षापासून प्रामुख्याने मार्डी जिल्हा परिषद गटात मुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

मात्र रोहिणी, मृग व त्या लगतची नक्षत्रे वाया गेल्याने माण तालुक्यात पेरणी योग्य पुरेसा पाऊस झालेला नाही. उघड्या डोळ्यात देखत खरीप हंगाम वाया जात असल्याने शेतकरी प्रचंड अडचणी सापडलेला आहे. गतवर्षी शिंगणापूर ते कारखेल या पट्ट्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने सध्या त्या परिसरातील अनेक गावात पिण्याचे पाणी आजही टँकरने पुरवले जात आहे. मात्र या परिसरात या वर्षी 25 जून च्या दरम्यान झालेल्या थोड्याशा पावसावर खरिपाची काही प्रमाणात पेरणी झालेली आहे.मात्र पावसा अभावी तेही पीक पुरेशा पावसाअभावी धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्याची माण तालुक्यातील पाऊस परिस्थिती लक्षात घेता माण तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा
उपक्रम शासनाने हाती घेणे अत्यंत गरजेचे वाटत आहे.ज्यावेळी सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बाजूस प्रचंड पाऊस पडतो त्यावेळेला माण तालुक्यात कृत्रिम पाऊस योग्य ढगाची परिस्थिती चांगली असते या दरम्यान कृत्रिम पाऊस पडल्यास रिझल्ट चांगला येऊन शेतकऱ्याला दिलासा देणे शक्य असल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले. मात्र याबाबतचा दृष्टिकोन कोणाकडे आहे का ? हाच खरा प्रश्न आहे? शासनाचे काम पाट्या टाकण्यासारखे असते हे सर्वांनाच माहित आहे. यात भरङला जातोय तो माणदेशी शेतकरी . अशा अडचणीच्या कालावधीत शेतकऱ्याला वाली कोण ? हंगाम संपून गेल्यावर पाऊस पडून त्याचा फायदा काय ?.माण तालुक्यातील हजारो हेक्टरवरील खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत .अन झालेल्या दहा-पंधरा टक्के पेरण्याही पावसाअभावी वाया जाणार आहेत .अशा अडचणीच्या परिस्थितीत स्थानिक जिल्हा प्रशासनाने कृत्रिम पाऊस पडण्याच्या उपयोजनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणे गरजेचे आहे.
यामध्ये लोकप्रतिनिधीचे योगदान महत्त्वाचे आहे.किमान तसा प्रयत्न तरी करणे गरजेचे आहे.पण काही न झाल्यास माणवाशीया साठी दुष्काळ हा पाचवीला पूजलेलाच आहे .
माण तालुक्यातील सात मंडलापैकी कुकुडवाड मंडळात 219 मिलिमीटर पाऊस झाल्याचे नोंद आहे मात्र त्याच गटात काळचौंडी शेंनवडी वरकुटे मलवडी व परिसरात तीव्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे . टेंभू योजनेचे पाणी या परिसरात सोडण्याच्या मुद्द्यावरून राजकीय कुर घोड्या चालू आहेत, त्यात शेतकऱ्याचा ऊस मात्र पाण्याअभावी जळून चाललेला आहे ही वस्तुस्थिती कोण ही नाकारणार नाही .मलवडी मंडलात 77 मिलिमीटर पाऊस झालेला आहे.सदर पाऊसही विस्कळीत स्वरूपात असल्याने त्याचा पेरणी व पिकासाठी फारसा फायदा होत नाहीअशी वस्तुस्थिती असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.
प्राप्त नैसर्गिक परिस्थितीवर उपाययोजना म्हणून तसेच माण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनातर्फे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या उपाय योजनेचा प्रस्ताव तातडीने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे देण्याची मागणी प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.