आयुष्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जीवन विद्येचे ज्ञान आवश्यक – प्रल्हाद पै . झरे येथे चिंतन शिबीर उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
लुनेश विरकर
म्हसवड प्रतिनिधी :
जन्म आणि मृत्यू यांच्या मधील जीवन प्रवासात व्यक्तीला प्रत्येक गोष्टीची योग्य निवड करता आली तर व्यक्तीचे आयुष्य आनंदोत्सवात बदलून जाते असे स्पष्ट मत जीवन विद्या मिशनचे सर्वेसर्वा प्रल्हाद पै यांनी व्यक्त केले.
ते जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरे ता.आटपाटी या ठिकाणी चिंतन शिबिरात मार्गदर्शनपर बोलत होते.यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा.आर.एस.चोपडे,डॉ.दिलीप पटवर्धन, डॉ.सौ.माधवी पटवर्धन, जीवन विद्येचे पदाधिकारी पंकजराव नाईक, स्वप्नील पराडकर, संतोष सावंत,अहिल्या शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रल्हाद पै म्हणाले की, आयुष्यात यश व कीर्ती मिळविण्यासाठी प्रत्येकाजवळ कृतज्ञता हा गुण असणे आवश्यक आहे. कारण कृतज्ञताच माणसाला सर्वगुण संपन्न बनविते. त्याचबरोबर समृद्ध जीवनासाठी योग्य संगत ही महत्त्वपूर्ण ठरत असते हे ही सर्वांनी जाणीव पूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे.ज्ञानाला संस्कार आणि शाहणपणाची जोड देण्याचे काम जीवन विद्या मिशन करत आहे.आणि हेच काम अहिल्या शिक्षण संस्था उत्तमपणे करीत असल्याचे पै यांनी नमूद केले.
आयुष्यात जो अपयशाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो,तोच व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरा पर्यंत पोहचतो हे पै यांनी वेगवेगळ्या उदाहरणातून स्पष्ट केले.प्रगतीच्या सर्वोच्च ठिकाणी जाताना सर्वांना सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.आपल्या सभोवतालच्या व्यक्तींच्या भावभावनांचा आदर करणे तितकेच महत्वपूर्ण आहे.जीवनात प्रत्येक कृती करताना राष्ट्रहिताला प्राधान्य देणे अनिवार्य असल्याचे शेवटी प्रल्हाद पै यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन प्रा.आर.एस.चोपडे म्हणाले की,संस्थेची प्रगती सर्व सहकारी बांधवांच्या सहकार्यामुळेच करणे शक्य झाली आहे.प्रल्हाद पै यांची संस्था सदिच्छा भेट आम्हा सर्वांसाठी सुवर्ण दिन असल्याचे प्रा.चोपडे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवन विद्येच्या ज्ञानाचा अहिल्या शिक्षण संस्थेला व अहिल्या सेवकांना झालेला उपयोग या विषयाची चित्रफीत दाखविण्यात आली.झरे येथील कार्यक्रमापूर्वी प्रल्हाद पै व मान्यवरांनी पेंड हायस्कूला व कार्यक्रमानंतर विरळी हायस्कूला भेट देऊन गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास वाघमारे यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक व प्राचार्य अशोक पडळकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य अशोक पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले.विद्यालयच्या प्रांगणातील कै.बॅ.टी.के.शेंडगे यांच्या स्मृती स्थळांचे घेतले.नंतर कार्यक्रमाची सुरूवात विश्वसंत सद्गुरू वामनराव पै यांच्या प्रतिमा पूजनाने व विश्व प्रार्थनेने झाली व समारोप हे राष्ट्र आमचे या स्फूर्ती गीतांने करण्यात आले.
चौकट –
“अहिल्या शिक्षण संस्था जीवन विद्यामय”
संपूर्ण अहिल्या शिक्षण संस्था जीवन विद्यामय झाली आहे.संस्थेच्या या कार्याला वंदन करण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. संस्कारमय शिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे आणि ते काम अहिल्या शिक्षण संस्था जोमाने करीत असल्याचे दिसून आले.संस्थेच्या या विधायक कामाच्या मागे जीवन विद्या मिशन कायम ताकदीने उभे राहिल असा ठाम विश्वास जीवन विद्येचे सर्वेसर्वा प्रल्हाद पै यांनी व्यक्त केला.