पत्रकार शशिकांत वारीशेंचा अपघात की घातपात ? पालकमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले…
व्हिजन२४ तास न्यूज
मुंबई :
पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की घातपात याबाबत अद्याप ठोस माहिती आली नाही. मात्र वारीशे यांच्या नातेवाईकांनी ही हत्या झाल्याचे म्हटले आहे. पत्रकारांनी देखील या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान अपघातप्रकरणी संशय व्यक्त केला जात असताना या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता थारचालकावर भादंवि कलम ३०२ कलम लावले आहे.
यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, “गुन्हेगाराला पाठीशी घालण्यात येणार नाही. पालकमंत्री म्हणून या घटनेची मी स्वत: माहिती घेतली आहे. खोलात तपास केल्यानंतर असे लक्षात आले की हे जाणीवपूर्वक झाले. त्यामुळे ३०२ कलम लावण्यात आले आहे.
महाराष्ट्राने पत्रकारांसाठी जो जीआर काढला आहे. त्या जीआर नुसार कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत. पोलिस उपअधीक्षक यांच्याकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. तो रिफायनरी समर्थक असू दे की विरोधक असू दे, सर्वांना शिक्षा होईल. लोकशाहीत सर्वांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे उदय सामंत म्हणाले.
राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर तिन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पत्रकार शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, थारचालक पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात राजापूर पोलिसांनी भादंवि कलम ३०८, ३०४, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, त्याला अटक करून येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.