म्हसवड नगरपरिषद हद्दीतील एसटी स्टॅंड परिसरातील फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि चांदणी चौक ते शिक्षक कॉलनीपर्यंत अपूर्ण गटार कामांमुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून योग्य पावले न उचलल्याने अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता .आज उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासनाने त्याची अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही
केवटे यांच्या मते, एसटी स्टँड परिसरात फळ विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने थाटली आहेत, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ता चढ-उतार असल्यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होत असून, वाहनचालक आणि पादचारी दोघेही जखमी होत आहेत. त्याचबरोबर, चांदणी चौक ते शिक्षक कॉलनीपर्यंत अपूर्ण गटारीचे काम नागरिकांसाठी आणखी एक समस्या ठरत आहे.
“प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले आहे. काही गंभीर अपघात किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील,” असे केवटे यांनी सांगितले.