रेल्वे सुविधा बाबत माण तालुक्यावर अन्याय का ? प्रा. विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला
म्हसवड.. .प्रतिनिधी
दुष्काळी माण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तालुका रेल्वे सुविधा नी जोडावा अशी मागणी वरचेवर होत असताना केंद्र व राज्याच्या लोकप्रतिनिधीकडून रेल्वे सुविधा बाबत माण तालुक्यावर अन्याय का? असा प्रश्न किसान काँग्रेस पुणे विभागाचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
माण तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी फलटण, दहिवडी,तीर्थक्षेत्र गोंदावले,म्हसवड पिलीव व पंढरपूर याबरोबरच कराड दहिवडी पंढरपूर असा रेल्वे मार्ग सुरू करणे फायदेशीर होणार आहे.
माण तालुक्यातील जनता गेली अनेक वर्ष दुष्काळाच्या सावटा खाली
दबलेली आहे. तालुक्यात शेती पाण्यासाठी विविध पाणीपुरवठा योजनेचे पाणी काही अंशी आले असले, किंवा येणार असलेतरी त्याबाबतचा खात्रीशीरपणा काळच ठरवणार आहे. सध्या मंजूर असणाऱ्या विविध पाणीपुरवठा योजना मृगजळाप्रमाणे दिसत असून लबाडा घरचं जेवणाचं निमंत्रण प्रत्यक्ष जेवल्याशिवाय पूर्ण होत नसल्याचे आपल्याला माहित आहे.शासनाच्या योजना कागदावर दिसायला चांगल्या दिसतात.मात्र त्याची प्रत्यक्ष कार्यवाही एवढीशी सोपी नसते.त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अकरा गावासाठी सुरू केलेली पिण्याच्या पाण्यासाठीची शिगणापूर पाणीपुरवठा योजना होय.या योजनेतून कारखेलला पाणी पोहोचलं का? हा संशोधनाचा भाग आहे. शेवटच्या पंगतीतल्या माणसाला जेवायला काय मिळते हेही आपणाला माहित आहे.
दुष्काळी माण तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी औद्योगिक क्रांती महत्त्वाच्या असून त्यामध्ये रेल्वे वाहतूक सेवा हा प्रभावी उपाय आहे.
दळणवळणाची साधने वाढवून त्यास औद्योगिक प्रगतीची जोड दिल्यास सर्वांगीण विकास शक्य आहे.आणि म्हणूनच माण तालुक्यासाठी अनेक वर्षाची मागणी असणारी रेल्वे सुविधा सेवा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी खासदार व आमदार यांचा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.खासदारानी फलटण साठी रेल्वे सुविधा दिली मग माण तालुका वंचित का ठेवला ? रेल्वे सुविधाच्या माध्यमातून शेतीमालाबरोबरच औद्योगिक वाहतूक वाढली तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल व त्यातून त्याची प्रगती साधली जाईल.अन्यथा दुष्काळी माण तालुक्याचा कलंक आहे तसाच राहणार आहे.हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवून माणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना आज मात्र माण तालुक्याला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचे दिसत आहे.याला जबाबदार कोण ?आणि याबाबत कोण आवाज उठवणार आहे का ? हा खरा कळीचा मुद्दा आहे.
दुष्काळात कायमस्वरूपी पिचत पडलेल्या माण तालुक्यातील जनतेला प्रामुख्याने युवा पिढीला न्याय देण्यासाठी माण तालुक्याला रेल्वे सुविधा सुरू करावी अशी मागणी प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.