वडोली निळेश्वर शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम – पहिलीच्या प्रवेशासाठी तीन हजारांची मुदत ठेव; सरकारी मराठी शाळा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
प्रतिनिधी | सातारा
शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या बदलांमुळे आणि इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली चालणाऱ्या ‘मॉडेल’ शाळांच्या आकर्षणामुळे मराठी शाळांची गळती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील वडोली निळेश्वर येथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने एक अभिनव पाऊल उचलले आहे.
येथील जिल्हा परिषद मराठी शाळेने पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे ३,००० रुपयांची एक वर्ष मुदत ठेव पावती जमा करण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे शाळेची पटसंख्या टिकवण्याचा आणि शाळेला ‘आदर्श शाळा’ बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शुभांगी पवार, उपाध्यक्ष विजय पवार, व इतर सदस्य अण्णा पवार, संदीप पाटील, प्रीती शेवाळे, मोहिनी पवार, छाया पवार, अश्विनी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्याध्यापक प्रकाश लिंबारे व शिक्षिका रतन घोगरे यांचे यामध्ये विशेष योगदान आहे.
या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे – पालकांना मराठी शाळेतील गुणवत्तेची व उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये शाळेप्रती विश्वास निर्माण करणे. विजय पवार यांनी सांगितले की, “पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये फसव्या चमकदार जाहिरातींमुळे आकर्षित होतात. पण प्रत्यक्षात सरकारी मराठी शाळांमध्येही दर्जेदार शिक्षक, सुविधा व उपक्रम उपलब्ध आहेत. हे पटवण्यासाठी पालक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.”
पूर्वी मर्यादित साधनसंपत्ती असूनही ग्रामिण भागातील पालक मराठी शाळेकडे वळत असत. पण आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी शाळांच्या प्रभावामुळे मराठी शाळांची पटसंख्या कमी झाली असून अनेक ठिकाणी शाळा विलीनीकरणाच्या मार्गावर आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी वडोली निळेश्वर शाळेचा हा उपक्रम एक आदर्श ठरू शकतो.
या निर्णयाचे ग्रामस्थ आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, गावकऱ्यांचा शाळेप्रतीचा वाढता सहभाग निश्चितच सरकारी मराठी शाळा वाचवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरू शकतो.