उरमोडी योजनेचे पाणी ढाकणी येथील नवीन बंधाऱ्यात दाखल; उन्हाळ्यात माण-खटाव मतदारसंघाला दिलासा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी):
दुष्काळाच्या छायेत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. उरमोडी _जीहे-कठापूर योजनेचे पाणी अखेर मतदारसंघातील विविध भागांत दाखल झाले असून, ढाकणी (ता. माण) येथील नव्याने पूर्ण झालेल्या बंधाऱ्यात हे पाणी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेतून पाणी मानगंगा नदीत तसेच मतदारसंघातील अनेक लहान-मोठ्या तलावांमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई काहीअंशी दूर झाली आहे.
उरमोडी योजना हे पाणलोट क्षेत्रात मोठे पाणी स्रोत ठरले असून, या योजनेतून येणारे पाणी उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांसाठी संजीवनी ठरत आहे. विशेषतः ढाकणी येथील नवीन बंधाऱ्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि त्यांच्या भाऊंच्या निधीतून हा बंधारा उभारण्यात आला आहे.
पाणी सोडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत. पाण्यामुळे आता पशुधन वाचले असून, खरीप हंगामासाठीही शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे.
या योजनेमुळे माण-खटाव मतदारसंघातील पाणीटंचाई दूर होऊन, आगामी काळात जलसंधारणाच्या योजनांना देखील चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संपर्क साधले असता ग्रामस्थांनी सांगितले की,
“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही उन्हाळ्यातील पाण्याच्या त्रासाला कंटाळलो होतो. पण यावेळी बंधाऱ्यात पाणी आल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री महोदयांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.”