म्हसवड शहरातील उखरलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे. :-विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड….प्रतिनिधी
म्हसवड शहरात पिण्याच्या पाईपलाईनच्या नावाखाली उखरलेले रस्ते गेले वर्षभर नादुरुस्त अवस्थेत असून त्याचा विपरीत परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागत असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.
म्हसवड शहरातील उखरलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत या मागणीचे निवेदन प्रा. विश्वंभर बाबर यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना नुकतेच सातारा येथे दिले.
म्हसवड शहरात व वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकलेली आहे. पाईपलाईन टाकत असताना शहर व वाडी वस्तीवरील डांबरीकरण, काँक्रिटीकरण केलेले व चांगले स्थितीतील रस्ते उखरून त्यामधून पाईपलाईन टाकण्यात आली. पाईपलाईन साठी रस्ता उखरला मात्र गेले वर्षभर या रस्त्यांची कसलीही डागडुजी केलेले नाही. पाईपलाईन साठी रस्ता उखरणे गरजेचे आहे. मात्र तो रस्ता मूळ स्थितीत दुरुस्त करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची ? ठेकेदार बिले काढून मोकळा झाला., मात्र गेले वर्षभर दारात पडलेला मुरूम, धूळ याचा त्रास रहिवाशांना होत आहे. धुळीमुळे लहान मुलांमध्ये आजारपणाचे प्रमाणही वाढत आहे.
नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या अगोदर अनेक वर्षे प्रशासकीय राज होते. त्यावेळी रस्ता दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार व मुख्याधिकारी यांची होती. मात्र त्याकडे डोळे झाक करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे .किमान आता तरी नूतन पदाधिकारी व नगरसेवकांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे नाही का ? नादुरुस्त रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.
म्हसवड शहर व वाडी वस्तीवरील नादुरुस्त रस्ते त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबतची माहिती प्रा. विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी जिल्हास्तरीवरील नगर पालिका विभागाचे बापट यांना फोन करून विषय मार्गे लावण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती विश्वंभर बाबर यांनी सांगितले.

