माण तालुक्यातील धामणी या गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सौ. ऐश्वर्या स्वप्निल चव्हाण (वय 25) या विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या मनात याचे चटका लावणारे प्रतिबिंब उमटले आहे.
सहा वर्षांपूर्वी कराड येथे स्वप्निल बापूराव चव्हाण (वय 30) यांच्यासोबत ऐश्वर्या हिचा विवाह झाला होता. या दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुरळीत सुरु होते. स्वप्निल गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यांना तीन मुली होत्या, ज्यामध्ये कु. स्वरांजली (वय 6), कु. शिवानी (वय 3 महिने), आणि तिसरी मुलगी (वय 3 वर्षे) होती. स्वप्निल व ऐश्वर्या हे आपल्या कुटुंबासह माणतालुक्यातील चव्हाण वस्ती येथे राहत होते.
सोमवारी, दि. 21 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ऐश्वर्या यांनी अचानक आपल्या मोठ्या मुली स्वरांजली व तीन महिन्यांच्या शिवानी या दोन्ही मुलींना कमरेला बांधून घराजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत तिसरी मुलगी बचावली कारण ती आजीजवळ झोपलेली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पती स्वप्निल यांनीदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. ऐश्वर्या यांनी अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालेले नाही. म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि सखाराम बिराजदार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या संदर्भात कुटुंबीयांचे जबाब नोंदवले असून, घटनास्थळावरील साक्षीदारांनाही चौकशी साठी बोलावण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण माण तालुका शोकमग्न झाला आहे. एका तरुण आईने दोन निरागस जीवांना आपल्या सोबत घेऊन केलेल्या या आत्महत्येमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.