‘शिवाजी राऊत’ हे सक्रिय कार्यकर्ते, चिंतनशील लेखक, शिक्षण अभ्यासक आणि पत्रकार म्हणून विख्यात आहेत.
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस नुकतीच दिडशे वर्षे पूर्ण झाली. या निमित्त त्यांनी ‘सत्यशोधक विचारधारा’ या पुस्तकातून महात्मा फुले आणि महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाचा लघुत्तरी वैचारिक आढावा घेतला आहे. हे अत्यंत परखड आणि नवअन्वेषी भाष्य, चळवळीतील कार्यकर्ते, इतिहास अभ्यासक आणि संशोधक याच्यासाठी अतिशय दिशादर्शक ठरणारे आहे.
जाती संस्था, अनिष्ट रुढी-परंपरा, दैवधिनता यावर कठोर प्रहार करत देवदेवळे व त्यांचे भाट यांच्यापासून गरिबांची मुक्तता केली पाहिजे, यासाठी रामस्वामी नायकर यांनी चळवळ सुरू केली. त्याच मार्गावरील महाराष्ट्रात सत्यशोधक विचार धारा बळकट करणारे धोंडिराम कुंभार, भाई माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे ते डॉ. बाबा आढाव आदी तमाम सत्यशोधक आहेत. या सर्वांना लेखकाने हे चिंतन अर्पण केले आहे.
सत्यशोधक प्रबोधनाची कृती.
महात्मा ज्योतिबा फुले हे मानवी जीवनाला शिक्षणातून सत्याकडे, सत्यातून शोषण मुक्तिकडे आणि सार्वजनिक नितीकडे सर्वांनी जायला हवे; असा विश्व बंधुत्वाचा विचार देतात. त्यांच्या कृतिशील प्रबोधनातून येथील धर्म आणि जात आधारित शोषण व्यवस्थेला चुड लागली. साहजिकच त्याला प्रचंड विरोध झाला. महात्मा फुले यांचे विचार अतिशय क्रांतिकारी होते. त्यांनी भारतीय सामाजिक व धार्मिक विश्वात प्रचंड उलथापालथ घडवून आणली. आज पुन्हा या विचारांची गरज भासत
आहे. सत्यशोधक समाजाच्या दिडशेव्या वर्धापन दिनानिमित्त त्याचा आढावा घेतला आहे. सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे, त्याचा संघर्ष, प्रबोधन, झालेला विरोध, स्वातंत्र लढा काळातील त्यांचे प्राध्यान्यक्रम , सत्तावादाचा पूनरूपी आग्रह आणि सत्यशोधक सत्ता शोधक बनत सरंजामी मानसिकतेत पुन्हा कसे गुंतले, याचा शोध घेतला आहे. सुधारकांचे विचार त्यांच्या काळात क्रांतिकारीच असतात. या बुद्धीवादी विचाराचे नवे स्वरूप समजावून घेत ते समाजाला प्रतीत करणे आवश्यक असते. त्या हेतूने चळवळीचे अंतरंग मांडल्याचे लेखकाने आपल्या मनोगतात नोंदविले आहे.
मानवी स्वातंत्र्याचा विचार..
म. ज्योतीराव फुले यांचा विचार मानवी स्वातंत्र्य आणि सक्षमतेकडे नेणारा होता. त्यांचा हल्ला हा शोषण पध्दतीवर होता. तो कोणा विशिष्ट जातीविरूद्ध नव्हता. मात्र तो त्यांच्या विचार विरोधक सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना कधीच कळला नाही. तसेच ते सत्यशोधकांना देखील उशिरा उमगले, असे मार्मिक निरीक्षण नमूद केले आहे.
विचार धारांचा शोध..
सत्यशोधक समाज आणि सत्याग्रही विचार अशा दोन विभागात या विचारधारांचा लेखकाने शोध घेतला आहे.
‘सत्यशोधक चळवळ झोत’ या प्रकरणात नोंदविले आहे की ब्रिटिश येथे आल्यानंतर त्यांनी अनेक निर्बंध घातले. सर्वांसाठी एक कायदा केला. शिक्षण सार्वत्रिक केले. या सुधारणांमुळे आपले जातीय व धार्मिक स्थान धोक्यात आल्याची जाणीव वर्चस्ववादी नेते व घटकांना झाली. त्यातून वर्ण वर्चस्व वादाविरोधात उद्रेकाची भीती निर्माण झाली. परिणामी ब्रिटिश सत्तेला विरोध आणि सापेक्ष राष्ट्रभक्ती, धर्म, अध्यात्म आणि राष्ट्र गौरव सुरू झाला. दुसरीकडे सत्यशोधक समाज धर्म व जाती व्यवस्थेचे शोषण नाकारत शेटजी,भटजी यांना आव्हान देत होता. त्यातून मग सत्यशोधक हे धर्म विरोधक आहेत. ब्रिटिश धार्जिणे आहेत, असे आरोप व हल्ले सुरू झाल्याचे दिसून येते.
पुढील काळात गांधीजींनी सत्याग्रह आणि अहिंसा मार्ग स्वीकारत स्वातंत्र्य आंदोलन तीव्र केले. त्यात सत्यशोधकी प्रबोधन क्षीण झाले. दरम्यान धार्मिक
मुखंड, नव भांडवलदार, जमीनदार यांनी आपले प्रभुत्व कायम राखले. एकीकडे ब्रिटिश सत्तेला गोंजारत हितसंबंध राखले तर दुसरीकडे स्वातंत्र आंदोलनात गांधीजींना विरोध केला. तसेच सत्यशोधक चळवळ नामशेष करण्याचा भरकस प्रयत्न केला. सतत विविध प्रकारे धार्मिक भय निर्माण करून बहुजनांना पुन्हा दैववादी आणि मानसिक गुलाम केल्याचे दिसून येते.
सावित्रीबाई फुले यांची प्रबोधन कृती..
सत्य चालणे, सत्य बोलणे सावित्रीबाई फुले प्रकरणात स्त्री शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. स्त्री ही परावलंबी राहून मुक्त राहू शकत नाही. तिचे शिक्षण हेच जीवन; हा सूक्ष्म विचार सावित्री बाईंनी मांडला. तो विचार आजचे स्त्री पुरुष करतात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आज भौतिक स्वार्थ, शरणता, ईश्र्वरी भयातून फुलवलेली आध्यात्मिक बाजारपेठ आदींनी स्त्रीचे भावविश्व काबीज केल्याचे मार्मिक निरीक्षण नोंदविले आहे.
..तर सत्यशोधक अध्यात्मिक झाले
यामध्ये समकालीन स्वातंत्र आंदोलन आणि सत्यशोधक समाज यांच्यात प्राधान्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे वास्तव मांडले आहे.
श्रध्दा भाषा आणि विचार भाषा..
भाषा हे संवादाचे प्रमुख साधन आहे. मात्र प्रबोधनाचे अंतरंगात सनातनी यांची श्रध्दा भाषा आणि सुधारकांची विचार भाषा असे द्वंद दिसून येते. सुधारक सुगम बोली आणि मौखिक भाषेचा उपयोग करतात. त्यांची भाषा
सामान्य जनात विचारांचे स्पष्टीकरण आणि मनात खोलवर रोपण करते. तर श्रध्देच्या भाषेत एक कुटील राजकारण असते. सनातनी नेहमीच भाषेला शुद्ध अशुद्ध ठरवून त्या भाषेतील विचार नाकारण्याचे कार्य करतात; या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांची भाषा आणि भाषणे याचा सुंदर उहापोह लेखकाने केला आहे.
म.फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म सामाजिक धार्मिक गुलामगिरीच्या विरोधात आसूड ओढत आर्य भटांच्या वर्तनाची चिकित्सा करतो. धर्मवाद्यांनी कष्टकरी वर्गाच्या मनात जे मृत्युचे भय निर्माण करून शोषण केले त्याला उघड करतात. साहजिकच फुले विचाराचा विरोध आज देखील कसा कायम आहे.
या पुस्तकातील महात्मा फुले यांचे मारेकरी म्हणून आलेले धोंडीराम कुंभार यांचे फुले विचारातून झालेले परिवर्तन अतिशय वाचनीय आहे.
महात्मा फुले यांच्या बुद्दीवाद विचारांबद्दल सत्यशोधक समाजाची भूमिका स्पष्ट नाही. धर्म जंजाळ व शोषण याला बळी स्वजातीय श्रध्दा कुरवाळीत दुसऱ्या बाजूला आपण सत्यशोधक असल्याचे भासवित आहोत. फुले यांचा बुद्धिवाद मात्र जैसे थे राहिला याबद्दल लेखकाने खेद व्यक्त केला आहे. धर्म भोळेपणामुळे धर्म अवडंबर आणि पर्यायाने उन्माद वाढत आहे. हिंदू समाजाचे असत्य वर्तन हिंसक स्वरूपात परिवर्तित होत आहे. ते बदलण्यासाठी सत्यशोधक वृत्ती व आचरणशिलता गरजेची असल्याचे राऊत यांनी नमूद केले आहे
सत्यशोधक हा असत्याचा विरोधक..आहे असे सांगत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सत्यशोधकी विचाराचा परामर्श लेखकाने घेतला आहे.
गांधी तत्वज्ञान संक्षिप्त ओळख..
पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात गांधी तत्वज्ञानाचा लेखाजोखा मांडला आहे. गांधीजींचे जीवन व सत्य यामध्ये गांधीजींनी ईश्वराला सत्य मानले नाही तर सत्यालाच ईश्वर मानले, असे मांडले आहे. तर गांधीजी व आणि प्रार्थना शोध प्रकरणात गांधीजींचे प्रार्थना चिंतन, विश्लेषण आणि ईश्वराचे अस्तित्व याबाबतचा वर्तमानातील संघर्ष यावर संक्षिप्त टिप्पणी केली आहे. मृत्यु आणि निर्भयता हा विचार आयुष्यभर कृतीतून सिद्ध करणारे दाखविणारे राष्ट्रपिता या भयकालात देखील उपयुक्त ठरतात; असा विचार या पुस्तकातून अधोरेखित केला आहे.
अतिशय साधी, सरळ भाषा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. हे विचार प्रवर्तक पुस्तक असून दोन महात्म्यांच्या विचारांचे संक्षिप्त पण काळानुरूप परखड व सडेतोड चिंतन त्यात आहे. रा.ना.चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांनी हे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले. वाचक त्याचे स्वागत करतील ही अपेक्षा..!