जनाधार आमचा आहेच! काँग्रेसला पुन्हा भरारी देणार – जिल्हाध्यक्ष देशमुख”
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
कराड (प्रतिनिधी) –
“काँग्रेस पक्ष सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे, परंतु पक्षाची विचारधारा, जनाधार आणि नेतृत्वशक्ती यामुळेच काँग्रेस पुन्हा नवसंजीवनी घेऊन उभी राहील,” असा ठाम विश्वास सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा खजिनदार बाबासाहेब कदम, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कराड शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांची उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, “यशवंतराव चव्हाण आणि प्रेमलाल चव्हाण यांच्या विचारधारेने राज्यभर काँग्रेसची पाळंमुळे रुजली. सध्या पक्षात मरगळ आली असली तरी ही केवळ एक पोकळी आहे. काँग्रेसला संघर्ष करावा लागेल, आणि याच संघर्षातून काँग्रेस नव्याने उभी राहील.”
निवडणुकांत स्वबळावर लढण्याचा विचार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस या निवडणुका आपल्या चिन्हावरच लढणार आहे. “जिथे गरज भासेल, तिथेच युतीचा विचार केला जाईल. महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी सामोपचाराने चर्चा करून निर्णय घेऊ. पण स्थानिक स्तरावरील निर्णय स्थानिक नेते घेतील,” असेही ते म्हणाले.
संघटनात्मक बांधणीला प्राधान्य
“सध्या जिल्ह्यातील राजकीय वास्तव लक्षात घेता अत्यंत सूक्ष्म नियोजन करून काम करणे आवश्यक आहे. आगामी १५-२० दिवसांत संघटनात्मक बांधणी करून निवडणुकीसाठी सक्षम पद्धतीने तयारी सुरू करू. काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा स्वराज्य संस्थांवर फडकताना दिसेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यकर्त्यांना ताकद देणार
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे, असे सांगून देशमुख म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी मला आणि इतर तरुण नेत्यांना संधी दिली. आता ही संधी विकासात आणि संघटनबांधणीत बदलून दाखवू. पक्ष कार्यकर्त्यांना तळागाळापर्यंत पोहोचून ताकद देणार आहे.”
विचारधारेची लढाई असल्याचे मत
उदयसिंह पाटील उंडाळकर यांना रोखण्यात अपयश आल्याबद्दल प्रश्न विचारला असता, देशमुख यांनी स्पष्ट केले की, “ही वैयक्तिक लढाई नाही, ही विचारधारेची लढाई आहे. काँग्रेसच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी जागा कायम आहे.”
पत्रकार परिषदेनंतर रणजितसिंह देशमुख यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून आपली बांधिलकी अधोरेखित केली.