नृत्यसम्राज्ञी माया जाधव यांचा गौरवशाली प्रवास: ७५ व्या वर्षात पदार्पण
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई :(प्रतिनिधी )
पॅरिसमध्ये झालेल्या भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या फेस्टिव्हल ऑफ इंडिया कार्यक्रमात जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक मराठमोळी लावणी सादर करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळवून देणाऱ्या नृत्यसमशेर माया जाधव या २५ मे २०२५ रोजी आपल्या आयुष्यातील ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
कोल्हापूर येथे जन्मलेल्या मायाताईंनी शिवाजी विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर १९६४ पासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आजवर त्यांनी ६२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून त्यात दोन हिंदी आणि एका गुजराती चित्रपटाचा समावेश आहे.
त्यांनी “होनाजी बाळा”, “संगीत बावनखणी”, “जय जय गौरी शंकर” यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये अभिनय केला असून त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विविध प्रसिद्ध वाद्यवृंदासह – ज्यात गायक मुकेश, संगीतकार कल्याणजी-आनंदजी व बाबला यांचा समावेश होता – त्यांनी अनेक परदेश दौरे केले व लावणीसह विविध नृत्यप्रकार सादर केले.
रशिया, जर्मनी, मॉरिशस, इस्रायल, दुबई येथे आयोजित भारत महोत्सवातही मायाताईंनी लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी दूरदर्शनवरील “दार उघड बये”, “अवघाची संसार”, “कुंकू” यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही अभिनय केला आहे. “सखा माझा पांडुरंग” ही मालिका सध्या सन टीव्हीवर सुरु आहे.
त्यांनी “कुलस्वामिनी” ही संस्था स्थापन करून सहा दर्जेदार लोकनाट्ये, तीन पारंपरिक लोककला कार्यक्रम तसेच हिंदी वाद्यवृंदावर आधारित कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. याशिवाय कृणाल म्युझिक संस्थेच्या १५०० VCD निर्मितीत त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. यातील “रेतीवाला नवरा”, “रसिकाच्या लग्नात”, “पार्वतीच्या बाळा”, “सोळा हजारात देखणी”, “निसर्ग राजा” या VCD विशेष गाजल्या.
माया जाधव यांना मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचा विशेष महिला पुरस्कार, तसेच मुंबई दूरदर्शनचा हिरकणी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या वयातही मायाताई उत्साही, कार्यक्षम आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.