गणेश तळेकर मुंबई, दि. ५ फेब्रुवारी–
“लेखकाने सर्वसामान्य लोकांचा आवाज व्हायला हवं,” असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सवात ते बोलत होते.
“लेखकाने गोंगाटात शांतता शोधायला हवी आणि शांततेला आवाज द्यायला हवा. माझ्या लेखनातून मी नेहमीच परीघावर असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला,” असे खोत म्हणाले.
खोत यांच्या गावठाण, धूळमाती, रौंदाळा, रिंगाण, झडझिंबड, काळयामाळया भिंगोळया या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या आहेत. “लेखक आपल्या भेटीला” या कार्यक्रमात कवी विजय सावंत यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
“रिंगाण” या कादंबरीसाठी दोन वर्षांपूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या खोत यांनी आपल्या भाषणातून समाजातील दुर्लक्षित घटकांच्या वेदनांना शब्द देण्याची लेखकाची जबाबदारी अधोरेखित केली.