स्वार्थासाठी केलेल्या दडपशाहीने विकास होत नसतो : विक्रम शिंगाडे राजकाराणासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या आमदारांचा घातकी चेहरा जनतेने ओळखला आहे ; समर्थकांनी आपलं नसलेलं ज्ञान पाजळू नये

बातमी Share करा:

 व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड,  :
       गरीब आणि भोळ्या शेतकर्‍यांना वेठीस धरुन त्यांच्या जमिनी लुबाडून विकास होत नसतो. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करायचं असतं. शेतकरी, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना एकमेकांच्या बद्दल विश्वास वाटायला पाहिजे. आणि असं निकोप वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. सत्तेच्या मस्तीत मी करेल तो कायदा असं वागून चालत नाही. स्वार्थासाठी केलेल्या दडपशाहीने विकास होत नसतो असा सणसणीत टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम शिंगाडे यांनी लगावला.
म्हसवड परिसरातील प्रस्तावित एम.आय.डी.सी. च्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.
विक्रम शिंगाडे म्हणाले, शेतकर्‍यांशी संवाद न साधता, त्यांचे मत विचारात न घेता बेंगलोर – मुंबई काॅरिडाॅर अंतर्गत म्हसवड परिसरात सध्या सुरु असलेले एम.आय.डी.सी. चे काम हे मुलभूत अधिकारांना पायदळी तुडविण्यासारखे आहे. कोणतीही एमआयडीसी यशस्वी करत असताना लोकांना विश्वासात घेवून व त्यांच्या संमतीने काम करायचं असते. त्यासाठी अनेकवेळा बैठका घ्याव्या लागतात. स्थानिकांच्या शंका दूर कराव्या लागतात. वादातील जमिनी घेवून त्या कंपन्यांना दिल्या तर त्या घेत नाहीत. कंपन्यांना शांततेत जमिनी हव्या असतात. बागायती व घराखालील जमिनी घ्यायच्या नसतात ही पध्दत आहे. आणि तशी येथील स्थानिकांची सुध्दा मागणी आहे. यासोबतच त्यांना दिली जाणारी १५ टक्के जमिनी कुठे दिली जाणार आहे याची माहिती त्यांना देणे गरजेचे आहे.
विक्रम शिंगाडे पुढे म्हणाले, गोरगरीब शेतकर्‍यांना अडचणीत आणायचे धंदे करुन विकास होत नाही. तो करायचा असता तर गेल्या चौदा वर्षात का केला नाही? देशमुख साहेबांनी एमआयडीसीचे काम केले आहे. त्यांना सर्व माहिती आहे त्यामुळे उगाच नसलेले अर्धवट ज्ञान पाजळून साहेबांना शिकवायचा प्रयत्न करु नये. त्यामुळे साहेबांबद्दल बोलून स्वतःचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे सोडून द्या.
विक्रम शिंगाडे पुढे म्हणाले, आपण काय करतोय? कुणाबद्दल बोलतोय याचं जरा भान बोलणार्‍यांनी ठेवावं? उगाच कुणाची तरी तळी उचलण्यासाठी तोंड मोकळं सोडू नये. साहेबांनी म्हसवड काॅरिडाॅर एमआयडीसी बद्दल दुटप्पी भूमिका घेतली हे सबळ पुराव्यासह सिध्द करा अन मगच आरोप करा. वापरुन फेकून द्यायची ज्यांची पध्दत आहे त्यांची हुजरेगिरी करण्याचे परिणाम तुम्हाला लवकरच दिसतील असा इशाराही त्यांनी दिला.
…….
चौकट : महाविकास आघाडीच्या काळात बेंगलोर-मुंबई काॅरिडाॅर अंतर्गत एमआयडीसी मंजूर झालेली आहे. यासाठी आदरणीय शरद पवार, संबंधित खात्याचे तत्कालीन मंत्री नामदार सुभाष देसाई आणि आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे इतरांनी मोकळे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये.
…..
माणच्या जनतेशी कधीच प्रतारणा नाही
ज्यांनी कुणी एमआयडीसी इथून नेण्याचा प्रयत्न केला त्यांना आदरणीय प्रभाकर देशमुख साहेबांनी कधीच पाठिंबा दिला नाही. अन माणच्या जनतेशी सुध्दा कधीच प्रतारणा केली नाही अन ते करणार सुध्दा नाहीत हे आम्ही जाणतो.
……….
आमदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारणे बंद करावे. स्वतःच्या निष्क्रियतेची बिले दुसर्‍यावर फाडायची मात्र दुसर्‍यांनी केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय लाटायचे ही त्यांची जुनी खोड आहे. मतदारसंघातील जनता दुष्काळाने पिचलेली असताना मतदारसंघात दुष्काळ जाहीर झाला नाही. स्वतःला जलनायक म्हणवून घेणाऱ्यांना याची लाज वाटत नाही का?

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!