व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : (प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला. राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवत आतापर्यंतचा सर्वात मोठा कौल दिला. या निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मा. जयकुमार गोरे यांनी जवळपास 50 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. हे त्यांचे सलग चौथे यश असून, त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धडकी भरवली.
या विजयानंतर झालेल्या मिरवणुकीत एक बॅनर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. “भावी मंत्री साहेब” असा उल्लेख असलेला हा बॅनर म्हसवडचे नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी आपल्या दुकानासमोर लावला होता. या बॅनरने परिसरात मोठी चर्चा रंगवली.
मंत्रीपदाचा विश्वास बॅनरवरून दृढ निवडणुकीच्या निकालानंतर माण-खटाव मतदारसंघाचे आमदार मंत्री व्हावेत, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र, नितिन भाई दोशी यांनी “भावी मंत्री साहेब” या बॅनरद्वारे जयकुमार गोरे मंत्री होतील, यावर पूर्ण विश्वास असल्याचे सूचित केले होते.
मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या दिवशी सकाळीच भाजपच्या पक्ष कार्यालयातून फोन आला आणि मा. जयकुमार गोरे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याचे कळवण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाने माण-खटावसाठी अभिमानाचा दिवस ठरला. बॅनरवरील भविष्यवाणी खरी ठरल्याने परिसरातील जनतेत मोठा उत्साह होता.
जयकुमार गोरे यांच्या मंत्रीपदामुळे म्हसवड व परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. या यशाचे श्रेय त्यांच्या कठोर परिश्रमांना व जनतेच्या पाठिंब्याला दिले जात आहे. नितिन भाई दोशी यांच्या दूरदृष्टीचे व धाडसाचे कौतुकही होत आहे.
म्हसवड परिसरात आजही या बॅनरची व त्यातून व्यक्त झालेल्या दृढनिश्चयाची चर्चा सुरू असून, जनतेच्या आशा-आकांक्षा आता नवनिर्मितीच्या दिशेने वळल्या आहेत.