म्हसवड (प्रतिनिधी) आ. जयकुमार गोरे यांनी दुष्काळमुक्तीच्या अंतिम टप्प्यात जनतेला सोबत राहण्याचे आवाहन केले आहे. “गेल्या १५ वर्षांपासून माण-खटाव तालुक्यातील दुष्काळमुक्तीसाठी अहोरात्र काम करत आलो आहे. उरमोडी, तारळी, जिहेकठापूर योजनेचे पाणी तालुक्यात आणण्यात यश मिळवले आहे. आता टेंभू योजनेचे काम सुरु झाल्याने दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही माझ्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे; त्यामुळे भाजप महायुतीच्या पाठिशी राहून या लढ्यात साथ द्या,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
आ. गोरे पुढे म्हणाले, “मायणी आणि कुकुडवाडसह ५२ गावांसाठी टेंभू योजनेचे काम जोरात सुरु आहे. दीड वर्षातच या भागात २.५ टीएमसी पाणी येईल व दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाईल. आपल्या पाणीप्रश्नापेक्षा राजकारण मोठे नाही. दोन्ही तालुके दुष्काळमुक्त होतील, तेव्हाच माझ्या आमदारकीचे सार्थक होईल.”
त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, “माझ्याविरुद्ध विरोधकांचे डीएनए वेगळे असतानाही त्यांना एकत्र आणले आहे. मात्र, त्यांच्या जवळ माण-खटावसाठी कोणताच ठोस व्हिजन नाही, त्यामुळे ते जाती-पातीचे राजकारण करत आहेत. पण जनतेने या बुरसटलेल्या विचारांना थारा न देता दुष्काळमुक्तीसाठी भाजप महायुतीच्या पाठिशी उभे राहावे.”
आ. जयकुमार गोरे यांच्या या आवाहनाने मतदारसंघात उत्सुकता आणि नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.