उंब्रज विभागात पेरणी खोळंबली; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
उंब्रज | प्रतिनिधी – कुलदीप मोहिते
गत पंधरा दिवसांपासून उंब्रज परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती कामांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आशेचा किरण दिसत असतानाच आता त्यांच्या कपाळावर चिंता उमटू लागली आहे.
सुरुवातीला उशिरा आलेल्या पावसामुळे शेतजमिनी कोरड्या होत्या. मशागत करावी तर नांगर चालत नव्हता, पेरणी करावी तर ओलावा नव्हता. पण नंतरच्या जोरदार पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आणि बळीराजाने जोमात मशागत सुरू केली. मात्र, हा दिलासा क्षणिक ठरला.
सध्या पावसाने असा जोर धरला आहे की, शेतांमध्ये पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी शेतीच्या बांधांवरून पाणी वाहत आहे. परिणामी, काही ठिकाणी भात रोपांची लागवड झाली असली, तरी ती रोपे आता पाण्यात कुजण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वापसा पावसामुळे शेतीस योग्य ओलावा मिळणे आवश्यक असते, परंतु तशी परिस्थिती सध्या निर्माण होत नाही. पावसाचे प्रमाण इतके जास्त आहे की, जमिनीत पाय ठेवणेही कठीण झाले आहे. शेतात यंत्रसामग्री वापरणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.
यातच वाढलेले खतांचे दर, महागडी बियाणे, कीडनाशकांच्या फवारण्यांचा खर्च, त्यात सुगीच्या वेळी मजुरांचा तुटवडा – हे सर्व संकट आता शेतकऱ्यांवर अधिकच ताण आणत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा उद्योग केवळ नशिबावर चालतो आहे, असे चित्र पुन्हा एकदा उभे राहिले आहे.
या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते आणि आंतरगाव संपर्क देखील विस्कळीत झाले आहेत. परिणामी, शेतमालाच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी आता देवाकडे हात जोडले असून, लवकरात लवकर पाऊस थांबावा आणि शेतीस योग्य स्थिती निर्माण व्हावी, अशी प्रार्थना ते करत आहेत. प्रशासनाकडून देखील या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शासकीय यंत्रणांनी वेळीच परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत केली, तर हंगाम वाचवता येईल.
सध्या तरी उंब्रज विभागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसून येते, आणि खरिपाच्या यशस्वी हंगामासाठी पावसाच्या विश्रांतीची प्रतीक्षा सर्वत्र आहे.