सिद्धनाथ-जोगेश्वरी हळदी समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न : विवाहसोहळा 24 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता..

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड ( दिलीपराज कीर्तने )

लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या कार्तिक शु. प्रतिपदा ते मार्गशीर्ष शु.प्रतिपदा या तब्बल एक महिना चालणाऱ्या शाही मंगल विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्यापहाटे साडेपाच वाजता घटस्थापनेने करण्यात आला. त्याच दिवशी दुपारी 11 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात श्रींच्या पंचधातूंच्या उत्सवमूर्तिंना हजारो महिलांकडून हळदी लावण्याचा समारंभ, मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


आता तुलसी विवाहादिवशी म्हणजे शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

मंगळवार 14 नोव्हेंंबर रोजी दिवाळीपाडव्यादिवशी सकाळी 11 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात एका छोटेखानी दिवानावर श्रींच्या पंचधातूंच्या ऊत्सवमूर्ती स्थानापन्न करण्यात आल्या.परंपरागत प्रथेनुसार सालकरीणबाई सौ.राणी गुरव यांच्या हस्ते सर्वप्रथम श्रींना हळदी लावण्यात आल्या त्यानंतर गुरव समाजातील, शहरातील व परगावहून आलेल्या हजारो महिलांनी श्रींना हळदी लावल्या. यावेळी महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता ढोल, ताशा,सनई-चौघडा आदी मंगल वाद्यांच्या गजरात ,चार तासानंतर हा हळदी समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.

त्यानंतर श्रींच्या मूर्तींना लिंबू,दही,दूध,तूप,पंचामृत व गरम उदकाने अभ्यंगस्नान घालण्यात आले. नंतर या मूर्ती मूळ ठिकाणी स्थानापन्न करण्यात आल्या.
दरम्यान बुधवारी दि 15 नोव्हेंबर,‌ भाऊबिजेच्या संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचारती,धुपारती घेऊन सालकरी महेश गुरव, पुजारी मंडळी,ढाल,तलवार, श्रीनाथ मठातील रवीनाथ महाराज,राजदंडधारी पुरोहित,ढोल वाजवणारे घडशी,डवर वाजवणारे डवरी तसेच श्रींचे सेवेकरी,मानकरी आदींच्या लवाजम्यासह सिद्धनाथ चौकातून ,मुख्य पेठेतून,वेशीतून,वेताळबा मंदीर,पोलीसस्टेशन मार्गे सुमारे तीन कि.मी.अंतरावर असणाऱ्या “राजाच्या बागेतील” म्हातारदेवाच्या मंदीरात श्रींची भेट घेऊन ,‌आशिर्वाद घेऊन पुन्हा सर्व लवाजम्यासह आरती-मिरवणूक संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान वेशीत आली
‌ परंपरागत चालत आलेल्या प्रथेनुसार श्रींची आरती घरासमोरुन जाणार असल्याने महिलांनी आपापल्या घरासमोर सडा टाकून त्यावर आकर्षक व रेखीव ,मनाला आकर्षित करणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या. आपल्या घरासमोर श्रींची आरती मिरवणूक जास्तीत जास्त वेळ थांबावी म्हणून पारंपारिक प्रथेनुसार प्रत्येक घरातील सुवासिनींनी आरती घेतलेल्या सालकऱ्यांना औक्षण करून ओवाळले.घरातील सर्वांनी श्रींचे आशिर्वाद घेतले. त्याबरोबरच प्रत्येकाने ईर्षेने व स्पर्धेने फटाक्यांची मनसोक्त आतिषबाजी करण्यात आली.यालाच “दिवाळी मैदान “असे म्हणतात.यावेळी दिवाळी मैदान पाहताना पहाणारांचे डोळे अक्षरश: दीपून गेले. असे हे दैदिप्यमान दिवाळी मैदान पाहण्यासाठी दूरदूरवरुन लोक आवर्जून उपस्थित राहतात.

शुक्रवार दि 24 नोव्हेंबर रोजी (तुलसी विवाह) पहाटे साडेपाच वाजता घट उठविले जाणार असून,नवरात्र समाप्ती होणार असून बारा दिवसाचे उपवास सोडले जाणार आहेत.त्याच रात्री 12 वाजता श्रींचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. विवाहानंतरची” वरात “म्हणजेच येथील रथयात्रा होय.ही रथयात्रा मार्गशीर्ष शु.प्रतिपदा रोजी असते .चालू वर्षी रथयात्रा बुधवार दि.13 डिसेंबर रोजी आहे.या दिवशी होणाऱ्या रथयात्रेने म्हणजेच ,विवाहा नंतरच्या वरातीने, श्रींच्या या एक महिना चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची सांगता होत असते .
श्रींच्या या शाही विवाहसोहळ्याच्या निमित्ताने येथील मंदिराची आतील गाभाऱ्यापासून बाहेरील हत्तीमंडपा पर्यंतच्या संपूर्ण भागाची धूऊन ,घासून ,पुसून स्वच्छता,रंगरंगोटी,परिसर स्वच्छता,मंदिराच्या शिखरावरील व नवीन बांधकामावरील आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामांची सालकरी,पुजारी,मानकरी,सेवेकरी आणि भाविकांची मोठी लगबग अर्थात खऱ्या अर्थाने “लगीनघाई” सुरु आहे.
=======================

छायाचित्र:::

1) मंदिरातील गाभाऱ्याच्यापुढे म्हातारदेवासमोर श्रींचे घट बसविण्यात आले.भाविकांच्याकडून हे 12 दिवस 24 तास नंदादीप तेवत ठेवण्यासाठी समयांची गर्दी करण्यात आली.

2) श्रींच्या मूर्तींना हळदी लावताना सालकरीणबाई व इतर महिला.

3)हळदी लावलेल्या श्रींच्या उत्सव मूर्ती
4)हळद लागल्या नंतर श्रींना स्न घालताना महिलांची तोबा गर्दी…,
=========================


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!