व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता आणि पर्यावरण कार्यकर्ता सयाजी शिंदे यांना सांस्कृतिक आणि वने मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे मत मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती शीतल करदेकर यांनी व्यक्त केले आहे.
सयाजी शिंदे हे नाव मराठी व हिंदी सिनेमा, नाटक, आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आपल्या अभिनयानंतर त्यांनी सामाजिक आणि पर्यावरण विषयक कार्यातही आपली वेगळी छाप सोडली आहे. ‘सह्याद्री देवराई’ या त्यांच्या उपक्रमाने महाराष्ट्राच्या वृक्षसंवर्धन चळवळीत नवा अध्याय लिहिला.
“सयाजी शिंदे हे कलाकार म्हणून जितके महान आहेत, तितकेच ते सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यासाठी समर्पित आहेत. सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रासाठी असे तळमळीचे नेतृत्व महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळात असणे आवश्यक आहे,” असे करदेकर यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण सेवेत अग्रणी,वृक्षतुला,झाडांसाठी संमेलन,मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून झाडांची रोपं वाटप,या त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती केली. महाराष्ट्रातील कोणती झाडे पर्यावरणासाठी फायदेशीर ठरतील, यावर त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचा उपक्रम महाराष्ट्राच्या अनेक भागांपर्यंत पोहोचला असून देशपातळीवरही चर्चिला जातो
अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सयाजी शिंदे यांनी प्रवेश केला, परंतु त्यांची ओळख केवळ प्रचारक म्हणून मर्यादित ठेवू नये, अशी मागणी जोर धरत आहे. मंत्रीपदासारख्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविल्यास त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला प्रचंड फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
करदेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आवाहन केले आहे की, सयाजी शिंदेंसारख्या प्रतिभावंत आणि समर्पित व्यक्तिमत्त्वाला मंत्रीमंडळात स्थान देऊन महाराष्ट्रासाठी आदर्श उदाहरण निर्माण करावे.
“जसे खा. शरद पवार साहेब योग्य व्यक्तींची निवड करतात, तसेच अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सयाजी शिंदे यांच्यासारख्या गुणवत्तापूर्ण व्यक्तीला सांस्कृतिक आणि वने मंत्रीपद द्यावे,” अशी कळकळीची मागणी करदेकर यांनी केली.
सयाजी शिंदे हे केवळ एक अभिनेता नाहीत, तर एक प्रभावी कार्यकर्ता आणि पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांना सांस्कृतिक व वने मंत्रीपद देऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याची संधी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
शीतल करदेकर (संस्थापक अध्यक्षा, मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया)