सावरकर यांच्या खोट्या इतिहासावर लाक्षणीक उपोषणाचा इशारा
व्हिजन २४ तास न्युज (संपादक;अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
रत्नागिरी :प्रतिनिधी
२६ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरीतील भंडारी समाज संघ आणि समविचारी संस्थांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या इयत्ता ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट केलेल्या वि. द. सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधले, या चुकीच्या इतिहासाविरोधात लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष श्री. राजीव यशवंत कीर यांनी यासंबंधी एक निवेदन प्रसारमाध्यमांमध्ये दिले. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, खरा इतिहास सांगणारे दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी रत्नागिरीत स्वखर्चाने पतितपावन मंदिर बांधले होते, व त्याचा शिलालेख १९३१ साली मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वि. द. सावरकर यांचे नाव जोडले जात असून, यामुळे खरा इतिहास लपवला जात आहे.
श्री. कीर यांच्या आरोपानुसार, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संदर्भात अद्याप कोणतीही सुधारणा केली नाही, आणि याबाबत ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले होते. या निवेदनाला अद्याप प्रतिसाद न मिळाल्यामुळे, संघटनांनी २६ जानेवारी रोजी लाक्षणीक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री. राजीव यशवंत कीर यांनी सांगितले की, जर महाराष्ट्र शासनाकडून कार्यवाहीचे लेखी आश्वासन मिळाले, तर उपोषण स्थगित करण्यात येईल.