सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सणोत्सव काळात कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष आदेश जारी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सातारा, –
आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने विशेष आदेश जारी केला आहे.
गुढीपाडवा (३० मार्च), रमजान ईद (३१ मार्च), रामनवमी (६ एप्रिल), महावीर जयंती (१० एप्रिल) आणि हनुमान जयंती (१२ एप्रिल) या सणांदरम्यान मोठ्या प्रमाणावर मंदिरे आणि मशिदींमध्ये धार्मिक विधी पार पडतील. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे, तसेच ध्वनी प्रदूषणावर बंधने पाळली जावीत, यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ (सुधारणा अध्यादेश) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१४ अंतर्गत अधिकार वापरून ३० मार्च ते १३ एप्रिल या कालावधीसाठी विशेष निर्बंध लागू केले आहेत.
महत्वाचे आदेश:
मिरवणुकीवर नियंत्रण: कोणतीही मिरवणूक कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळेत काढावी किंवा काढू नये यासंबंधी पोलीस ठरवू शकतील.
गर्दी नियंत्रण: सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील.
ध्वनी प्रदूषण: ढोल-ताशे, वाद्ये, शिंगे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर नियंत्रण ठेवले जाईल.
सार्वजनिक सुव्यवस्था: धार्मिक स्थळे, घाट, सार्वजनिक स्नानगृहे आणि इतर ठिकाणी नियमांचे पालन सुनिश्चित केले जाईल.
सार्वजनिक कार्यक्रमांवर देखरेख: कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमात नागरिकांना गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
या आदेशांची अंमलबजावणी पोलीस अधीक्षकांपासून ते सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.