क्रांतिवीर शाळेच्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमाला राज्यात तिसरा क्रमांक – मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व आलिशा मुल्ला यांचे विशेष योगदान
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड (प्रतिनिधी) –
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमात म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि उपक्रमशील शिक्षिका आलिशा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबवली.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात स्वच्छता मॉनिटर दुसरा टप्पा उपक्रम राज्यभरातील शाळांमध्ये राबवला. यात हजारो शाळांनी सहभाग घेतला. तालुका, जिल्हा आणि विभागस्तरावर मूल्यांकन करून राज्यातील टॉप १० शाळांची निवड करण्यात आली, त्यात क्रांतिवीर शाळेने तिसरा क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले.
यापूर्वी पहिल्या टप्प्यातही शाळेने आपले वेगळेपण सिद्ध करत राज्यात पाचवा क्रमांक मिळवला होता. त्या कामगिरीबद्दल तत्कालीन शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिवांच्या हस्ते मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा सत्कार करण्यात आला होता.
शाळेतील विद्यार्थ्यांमधून स्वच्छता मॉनिटर टीम निवडण्यात आली. कचरा व्यवस्थापन, जनजागृती आणि सोशल मीडिया वापरातून प्रबोधन या गोष्टींवर भर देऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवला गेला.
विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कचरा टाकण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले.
कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी माहितीपर व्हिडिओ Instagram व Facebook वर अपलोड करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.
सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्यात आला.
नागरिकांना स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल प्रबोधन करण्यात आले.
या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि शिक्षिका आलिशा मुल्ला यांच्या अथक परिश्रमांना जाते. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजभान, जबाबदारी आणि स्वच्छतेची शिस्त याची जाणीव करून दिली.
सुलोचना बाबर यांनी सांगितले,
“स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती आपली जीवनशैली बनली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळेच हे यश मिळाले आहे.”
शिक्षिका आलिशा मुल्ला यांनी सांगितले,
“विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार आणि जनजागृतीसाठी वापरलेली नवकल्पनात्मक तंत्रे यामुळे आम्ही हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवू शकलो.”
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, शिक्षिका आलिशा मुल्ला, संपूर्ण शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख दिपक पतंगे तसेच पालक प्रतिनिधींनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
“आमच्या पुढील उद्दिष्टांमध्ये संपूर्ण म्हसवड शहर व आसपासच्या गावांमध्ये स्वच्छतेबद्दल व्यापक जनजागृती करणे आणि इतर शाळांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणे आहे.” – सुलोचना बाबर
राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या क्रांतिवीर शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन!