संघर्षनायक महादेवजी जानकर 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
प्रासंगिक
  मी १० वि ला असेन तेव्हा झरे ता आटपाडी या गावात महादेव जानकर येणार अशी बातमी धडकली. मला आकर्षण होतं पश्चिम महाराष्ट्रात ज्या व्यक्तीचा बोलबाला आहे थोडंफार का असेना पण आपला नेता येतोय म्हणून उत्साहाने सांगणारी मंडळी कौतुकाचे शब्द बोलताना दिसली अश्या माणसाला मला बघायचं आहे….
      कोण आहे हा माणूस ??? सांगलीच्या वालचंद कॉलेज मधून इंजिनिअरिंग ची डिग्री घेतलेला आणि त्यातही गोल्ड मेडल मिळविलेल्या धनगर समाजातील उच्च शिक्षित तरुण वेड्यासारखा मला किंवा माझ्या पक्षाच्या नेत्याला या भारत देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे म्हणत लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून फकिरासारखं गावोगावी मेंढपाळांच्या वाड्यांवर फिरताना , त्यांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारा हा व्यक्ती एक तर वेडा असावा किंवा ध्येयाने पेटलेला निखारा असावा…. जिथं पूर्ण हयात राजकारण करण्यात घालवलेल्या आणि पंतप्रधान पदाला आजवर न शिवणाऱ्या पण महाराष्ट्रात ज्यांच्याशिवाय सत्ता आणि पान दोन्ही हलत न्हवतं अश्या शरद पवार यांच्यावर आपली तोफ डागत विद्रोहाची भाषा करणारा अवलिया नक्की आहे तरी कोण ??? आणि मी त्या दिवशी शाळेचे काही तास चुकवून महादेव जानकर यांना बघायला गेलो. मी फाटका माणूस आहे…म्हणत अस्सल माणदेशी ( गावरान ) भाषेत बोलणारा उच्चशिक्षित , गोल्डमेडिलिस्ट इंजिनिअर बघूनच या माणसाबद्दल उत्सुकता आणखी वाढली.
      २००४ साली नांदेड आणि सांगली या दोन्ही ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवली…..कालांतराने २००९ ला माढा लोकसभा मध्ये शरद पवार यांच्या विरोधात स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे उमेदवारी जाहीर करून कडवा विरोध या सत्ता पिपासू पवारांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस केलं. आजवर पिचलेल्या , समाजाने बहिष्कृत केलेल्या अनेक मागास जातींना सोबत घेत , लाजऱ्या बुजऱ्या आणि राजकारण आपला घास नाही म्हणणाऱ्या व पिढ्यानपिढ्या प्रस्थापित मुजोर गावगुंडांना भिडणारा ,  धनगरांवर अन्याय करत असलेल्या व्यवस्थेवर कोणी तरी आघात करणारा नेता मिळाला म्हटल्यावर ही व्यवस्थेच्या मुजोर पणाने पिचलेल्या लोकांना मात्र एक आधार मिळाला. मुळात महादेव जानकर यांनी सत्तेचं गणित हे दीन दलित पिचलेल्या लोकांसाठी करायचं ठरवलं ते कांशीरामजी यांच्या प्रेरणेतून ….. पण फक्त विचार मांडले म्हणजे क्रांती होत नसते , पिचलेल्यांचा उद्धार होत नसतो हे जाणून ‘ राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो तर तो हिसकावून घ्यायचा असतो ‘ असं म्हणत फुले शाहू आंबेडकर यांचे विचार फक्त भाषणात सांगणाऱ्या मात्र प्रत्यक्षात त्याच पीडित लोकांना पायदळी तुडवणाऱ्या राजसत्तेवर प्रहार करत  सुरवात केली. दुसऱ्याचा राजमहाल आपल्या कामाचा काय ??? आपल्याला इथं कोणी फिरकू देत नाही … आपण आपली झोपडी बांधू म्हणत राजकारणाची नवी सुरवात केली. आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेत नवी खेळी केली.
         पुन्हा २०१४ साली भाजप सत्तेपासून हाकेच्या अंतरावर असताना गोपीनाथ मुंडे यांनी  महादेव जानकर यांना युतीसाठी साद घातली आणि त्या हाकेला वेळाने का असेना पण साद घालत मा’ध’व गट पूर्ण केला… आणि… बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला…. नेहमी प्रमाणे पवारांनी जानकर यांना वेड्यात काढलं… प्रत्यक्षात मतमोजणी वेळी पवारांना सुद्धा घाम फुटला ….कोणतंच राजकीय वलय नसलेला महादेव जानकर आता निवडून येतो की काय ..? ही भीती पवारांना वाटू लागली आणि दीन दलित , गरीब मागासलेल्या लोकांना महादेव जानकर यांच्यामध्ये ती धमक दिसली. सुप्रिया सुळे यांचा या लोकसभेत निसटता विजय झाला पण पवारांना जानकर काय चीज आहे हे पूर्णपणे समजलं. त्यानंतर जानकर भाजप सोबत मित्रपक्ष म्हणून असताना रासप च्या तिकिटावर आमदार झाले. भाजपचे जवळपास २३ उमेदवार निवडून येण्यामागे रासपच्या हक्काच्या मतांचा वाटा निश्चित होता…. त्यामुळे भाजपला धारेवर धरताच त्यांनी अडीच वर्षाने मंत्रीपद देऊ केलं . पुरोगामी म्हणवणाऱ्या फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या पक्षाने वारंवार अन्याय केला मात्र हिंदुत्ववादी भाजप ने काही काळ का असेना , मंत्रिमंडळात घेतलं… पुरोगामी असणाऱ्या महादेव जानकर यांनी सत्तेसोबत जुळवून सुद्धा घेतलं मात्र ‘ ‘ झेंडा आणि दांडा मात्र आपलाच ‘ यावर ठाम राहिले…
       मंत्रालयात आपला महादेव जानकर आहे यातच लोकांना समाधान वाटत होतं… तलाठी कार्यालयात उभं न करणाऱ्या  धनगराना आपला नेता महादेव जानकर मंत्री आहे हे माहीत होतं म्हणून ते धनगर मंत्रालयात ऐटीत फिरू लागले. अनेकांची मतं वेगळी असू शकतात , जानकरांनी काय केलं त्यांच्यासाठी वगैरे वगैरे ….ज्याला वन विभाग आणि पोलीस पायरीजवळ उभा करत न्हवते त्यालाच लुबाडून त्याच्यावरच गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाच्या कार्यालयात हक्काने जाता येत होतं आणि कोणी अडवलं तर जानकर साहेबांना फोन करू का ? म्हणताच त्यांना प्रवेश मिळत होता … हे सुद्धा काही कमी न्हवतं…. उपाशी आणि तहानेने व्याकुळ व्यक्तीसाठी पाणी सुद्धा अमृतासारखं असतं त्याप्रमाणे महादेव जानकर मंत्री झाला आणि गोरगरिबांना आधार झाला…. माझं वैयक्तिक मत आहे महादेव जानकर हा भोळा माणूस आहे…. स्पष्ट वक्ता आहे…. मात्र तरीही आजही जानकर म्हटलं की पाठीला उभा राहणारी लोकं आहेत हे विसरून चालणार नाही….
          इतरांनी कोणतेही अर्थ काढा फरक नाही पडत, मात्र या महादेव जानकर नावाच्या व्यक्तीने सर्वसामान्य , मेंढपाळ , दीन दलित लोकांना आत्मविश्वास दिला … होय आपण बदल घडवू शकतो आपल्या अधिकारासाठी आपण लढू शकतो ….इतकं मोठं स्वप्न उराशी बाळगलेल्या माणसाकडून सत्तेचं गणित आणि काही निर्णय चुकले असतील मात्र यातून त्यांनी कधीच मुसंडी मारलीय हे लक्षात घ्यावे लागेल.
टीप:- मी राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता नाही….. आजही महादेव जानकर यांना कमी लेखणाऱ्यांसाठी …..राष्ट्रीय समाज पक्ष अनेक राज्यात आहे…४ राज्यात पक्षाला मान्यता आहे , आमदार आहेत,  महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जिल्हा परिषद सदस्य आहेत , महानगरपालिका ताब्यात आहे पंचायत समित्या ताब्यात आहेत….
कर्नाटक , मध्यप्रदेश , गुजरात सह अनेक राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष पाय रोवून उभा आहे…  
आयुष्यभर जातीय राजकारण करून सुद्धा महाराष्ट्राच्याबाहेर ज्याचं अस्तित्व शून्य आहे त्यांनी महादेव जानकर यांच्याबद्दल न बोललेलं बरं…… 
©डॉ शहाजी मोटे-पाटील

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!