शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संवाद यात्रेचे आयोजन…प्रा. विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड….प्रतिनिधी
झोपी गेलेल्या राज्य शासनाला जाग आणण्यासाठी व शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस तर्फे शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार व प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन केल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले.
येत्या ४ते ११ डिसेंबर या कालावधीत विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये शेतकरी संवाद यात्रा आयोजित केली आहे. शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथून होणार आहे.
शेतकऱ्यांच्या संवाद यात्रे बाबत बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.धान, कापूस ,ऊस, कांदा सोयाबीन व इतर पिकाच्या पीक विम्याची रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही.बाजारपेठेत विविध पिकांना योग्य दर मिळत नाही,.. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध प्रकारच्या फळबागांचे व इतर धान पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून त्या ठिकाणचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देणे गरजेचे आहे .

महाराष्ट्रात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला असला तरी या ठिकाणी सोयी सुविधांचा अद्याप अभाव असून जाहीर यादीत अनेक तालुक्याचा समावेश प्रलंबित आहे या व इतर समस्यामुळे शेतकऱ्याना जीवन जगणे मुश्किल झाले आहे.मात्र दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार झोपी गेल्याचे सोंग करत आहे. याबरोबरच सरकार हेतू पुरस्कारपणे शेतकऱ्यांच्या समस्या कडे दुर्लक्ष करत आहे.भीषण अडचणीत सापडलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र किसान काँग्रेस तर्फे शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे.ही संवाद यात्रा येत्या ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत विदर्भातील आठ जिल्ह्यातून जाणार आहे.नंदुरबार ,धुळे, जळगाव, बुलढाणा ,अकोला ,अमरावती, वर्धा या जिल्ह्यातून संवाद यात्रा मार्गक्रमन करणार असून ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे संवाद यात्रेचे रूपांतर विराटआक्रोश मोर्चा मध्ये होऊन मोर्चा विधानभवनावर धडकणार असल्याचे बाबर यांनी सांगितले. शेतकरी संवाद यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी सभेचे आयोजन केले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री के सी पाडवी, यांच्याबरोबरच स्थानिक आजी माजी खासदार आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, किसान काँग्रेसचे पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी पश्चिम महाराष्ट्रातील किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांनी केले आहे.

