म्हसवड, प्रतिनिधी म्हसवड येथील अहिंसा पतसंस्था ही पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत नावाजलेली पतसंस्था असल्याचे विधान महाराष्ट्र राज्य जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष मिहीरभाई गांधी यांनी केले.
म्हसवडमध्ये आयोजित सत्कार समारंभात त्यांनी अहिंसा पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, ती सन्मती सेवा दलाचा एक भाग असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, अहिंसा पतसंस्था आणि माळशिरस येथील रत्नत्रय व चंद्रप्रभू पतसंस्था जैन समाजाच्या गौरवशाली कामगिरीचे प्रतीक आहेत.
या प्रसंगी अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिनभाई दोशी यांनी मिहीरभाई गांधी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी मिहीरभाई यांच्या नेतृत्वाखाली सन्मती सेवा दलाने जैन समाजातील अनेक समस्यांचे यशस्वीपणे निराकरण केले आहे. मंदिर जीर्णोद्धार, मुनीसेवा, वधुवर मेळावे, तीर्थयात्रा आणि स्वच्छता मोहिमा यांसारख्या समाजोपयोगी कार्यात मिहीरभाई गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सन्मती सेवा दलाचे नीरज व्होरा, माणदेशी फाउंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर देशमाने, जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महावीर व्होरा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या अध्यक्षपदी मिहीरभाई गांधी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असून, त्यांच्या पुढील कार्याबद्दल समाजात उत्सुकता आहे.