व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजयकुमार ढालपे
गोंदवले – प्रतिनिधी : माण तालुक्यातील राणंद तलाव सध्या कळीचा मुद्दा बनला असून याठिकाणी कुंपणच शेत खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शेतकऱ्यांना शेतीत टाकण्यासाठी माती मोफत द्यावी, अशाप्रकारचा आदेश असताना आणि फक्त ट्रॅक्टरला परवानगी असताना या तलावात पोकलेन आणि डंपर मालकांनी सध्या हैदोस घातला असून याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अधिकारी हात वर करून मोकळे होत आहेत. हे आमचं काम नाही, पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतय, अस यांच्याकडून सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाला जलसंपदा विभागाकडून आलेली प्रत आम्हाला आलीच नाही, त्यात आमचा काहीच रोल नाही. मग अशाप्रकारे टोलवाटोलवी होत असेल तर संबंधित ठिकाणी जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. पाटबंधारे विभागाला तहसील आणि प्रांत यांनी सक्त सूचना देत त्यांचा कर्मचारी त्या ठिकाणी थांबवून ठेवण्यास सांगितले होते. सोबत एक मंडलाधिकारी आणि पोलीस बंदोबस्त देऊ असे सांगितले होते, असे तहसीलदार यांनी सांगितले आहे.त्याचबरोबर मृदा व जलसंधारण विभागाकडून काही लोकांना माती उपशासाठी परवानगी कागदावर देण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता आम्ही कोणती परवानगी दिली नसल्याचे सांगितले जात आहे,मग याबाबत परवानगी येतेय कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा सगळा खेळ राजरोसपणे सुरू असला तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व गोष्टींचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. संबंधित ठिकाणाहून किती माती उचलली जातेय? ती शेतकऱ्यांच्या शेतातच जातेय का? दिवसभरात ट्रॅक्टरच्या एकूण किती खेपा होत आहेत? तसेच माती वाहकांकडून याबाबतचा अहवाल दररोज पाटबंधारे विभागाच्या गोंदवले येथील कार्यालयाला सादर करणे आवश्यक असताना पाटबंधारे विभागाचे श्रेणी -१ चे अभियंता यांच्याकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळत आहेत. या एकंदरीत प्रकारानुसार पाटबंधारे विभाग या संपूर्ण गोष्टीकडे कानाडोळा करत जबाबदारी झटकून नेमकं काय साध्य करू इच्छित आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
तलावातून वीटभट्टीसाठी ओढलेल्या मातीचे साठे डोंगराला आणि शेतकऱ्यांच्या वावरात? राणंद तलावातून अवैध माती उपसा करून त्या मातीचे साठे थेट वीटभट्टीवर न टाकता काही शेतकऱ्यांच्या वावरात तर काही उघड्या माळावर टाकले आहेत. याबाबत महसूल प्रशासन ही माती जेव्हा वीटभट्टीवर नेतील तेव्हा कारवाई,करू असे सांगत आहे. यामुळे मातीची खरी गरज असणारा शेतकरी माती मिळावी म्हणून एकीकडे आंदोलनाचा पवित्रा घेतो, तर वीटभट्टीवाले प्रशासनाला हाताशी धरून संबंधित शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
त्याचबरोबर प्रशासनाला सगळे पुरावे देऊनही एकमेकांवर टोलवाटोलवी करणारे प्रशासन या अवैध माती उपसा करणाऱ्यांनी किती रुपयांत मॅनेज केले, असा सवालही जनसामान्य शेतकऱ्यांमधील चर्चेदरम्यान व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया : ०१)शेतीसाठी माती न नेता अवैधरित्या वीटभट्टीसाठी माती नेणाऱ्यांवर नियमित दंडाच्या तुलनेत पाचपट दंड वसूल केला जाईल. पाटबंधारे विभागाच्या मालकीचा तलाव असल्याने संबंधित विभागाचा एक कर्मचारी दररोज त्या ठिकाणी असणे अपेक्षित आहे. — तहसीलदार विकास अहिर
प्रतिक्रिया : २) राणंद तलावातील अवैध रित्या आणि रात्री होणाऱ्या माती उपशाबाबत प्रशासनाला सगळे पुरावे दिले आहेत,मात्र आचारसंहितेचा बुरखा पांघरून प्रशासनच अशा लोकांना अवैध माती उपसा करण्यास पाठबळ देत असल्याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे आम्ही मंगळवारी प्रशासनाला घेराव घालणार आहोत. — धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष मनसे
छाया – राणंद तालाव्यातील बेसुमार माती उपसा सुरू