व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर
मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे आयोजित बालरंगभूमी संमेलनाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालरंगभूमीवरील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रसिद्ध लेखिका प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सन्मान सोहळ्याला संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर, डॉ.मोहन आगाशे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, गंगाराम गवाणकर, शैलेश दातार, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, गणेश मतकरी, सुप्रिया मतकरी आदी मान्यवरांसह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी शेख, कार्यकारिणी सदस्य धनंजय जोशी, दीपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, आनंद जाधव, त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.
सन्मान स्वीकारताना प्रतिभा मतकरी म्हणाल्या, “बालरंगभूमी नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. यशस्वी बालरंगभूमीसाठी मी सातत्याने प्रयत्न केले. बालरंगभूमी परिषदेने माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. परिषदेच्या प्रयत्नांमुळे बालरंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्वास आहे.”
पद्मश्री उदय देशपांडे, चित्रकथी परंपरा जोपासणारे पद्मश्री परशुराम गंगावणे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, संगीतकार सलील कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच भार्गव जगताप, खुशी हजारे, आरुष बेडेकर, मायरा वायकुळ यांसह अनेक बालकलाकारांना गौरवण्यात आले.
बाल कलाकारांनी सादर केलेल्या नृत्य-नाट्य कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. चिंची चेटकणी या विशेष नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली.
“बालपण हरवते आहे का?”, “पालकांच्या अपेक्षा आणि मुले”, “वाचनसंस्कृती”, “मोबाईल चांगला की वाईट” या विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर यांनी केले.