पिढी बिघडण्यामागे आई-वडीलच जबाबदार….!*ह.भ.प. भरत महाराज शिंदे उर्फ चांडाळ चौकडी वेब सिरिज कलाकार बाळासाहेब.* 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज  (संपादक:अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापूर प्रतिनिधी :
                    आजची पिढी बिघडण्यामागे आई-वडीलच जबाबदार असून खरे संस्कार मूल्य जपण्याची वेळ आज आई-बाबा वरच आलेली आहे, असे मत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब  सिरीज मधील कलाकार ह. भ. प. भरत महाराज शिंदे उर्फ बाळासाहेब यांनी व्यक्त केले. अ.भा. मराठा महासंघ शाखा भिगवण संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाचेवतीने भिगवण येथील शिवरत्न कॉम्प्लेक्समध्ये  शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेतील ‘ चला…. संस्कार मुल्य जपुया!’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे यावेळी उपस्थित होते. प्रायोजक प्रतिनिधी म्हणून कृषीरत्न अर्थमुव्हर्स अँड स्टोन क्रशर शेटफळ गढे येथील संतोष काका वाबळे, शेटफळगढे येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ज्ञानदेव नरहरी भोसले व स्वामी चिंचोली येथील हॉटेल तृप्ती गार्डन  चे संचालक शरद नाथसाहेब भोसले हे उपस्थित होते.
             शिंदे पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी शिवाजींना घडवलं एवढाच इतिहास आपणास माहिती आहे, परंतु त्या घडवण्यामागे त्यांचा किती संघर्ष होता हेही  माहीत असणे गरजेचे आहे. मराठ्यामराठ्यातच ज्यावेळी लढाया होऊन एकमेकांचे मुडदे पाडल्या जात होते त्याचा जिजाऊंना अतिशय त्रास होत होता. त्याकरिता त्या शहाजीराजांना आपल्या पुण्यातील जहागिरीच्या ठिकाणी जाण्याचा आग्रह करीत होत्या. शेवटी  पोटात शिवबा असतानाच त्यांनी पुणे गाठले आणि शिवाई देवीसमोर नतमस्तक होऊन मराठ्यातील हा संहार थांबविण्यासाठी अशा पुत्राला माझ्या पोटामध्ये जन्माला घाल की, तो मराठ्यांचा आपापसात होणारा संहार दूर करेल. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जिजाऊंचे हे संस्कार राजे शिवछत्रपती वर झाले. असेच संस्कार आजच्या आयांकडून आपल्या मुलाबाळावर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. आज आपला मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर आईने त्यांचेकडे लक्ष न देता टीव्हीवरील सिरीयल बघण्यातच जर वेळ घालवला तर मुलेही आपल्या आईप्रमाणे त्या सिरीयल पाहतील व तसेच  संस्कार त्या मुलांवर होतील असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी ‘जसं पेरलं तेच उगवते’ या न्यायाने आई-बाप जर वाईट कृत्य करत असतील तर त्यांच्या मुलावर त्याचे वाईटच परिणाम होतील आणि आईबाप चांगले कृत्य करीत असतील तर त्याचे परिणाम चांगलेच दिसून येतील. याकरिता प्रत्येक आई-बापाने आपल्या घरात वावरताना स्वतःवर काही बंधने घालून घेणे जरुरीचे आहे असेही ते म्हणाले.
                दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मराठा महासंघाचे मार्गदर्शक सुरेश दादा जगताप, गजानन बापू जगताप, संजय जगताप, सुभाष फलफले, बाळासाहेब गोडसे, ऍड. माधव शितोळे, संजय ननवरे, दत्ता लोखंडे, नानासाहेब बंडगर, नंदकुमार धांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.  ज्याच्या घरात शिक्षणाचा लवलेशही नाही आणि पैसे खर्च करून वैद्यकीय शिक्षण घेणेही त्याला शक्य नाही अशा पांडुरंग मोहन नहाणे या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत ६४६ गुण मिळवून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांनी यावेळी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. संकेत मोरे यांनी तर प्रायोजकांची यशोगाथा वाचन संजय चौधरी यांनी केले. पांडुरंग वाघ यांनी सादर केलेल्या वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!