जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील हिंदू आणि मुस्लिम पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून, देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून म्हसळा तालुक्यातील दिघी नाक्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दहशतवादाचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘दहशतवादाचा नाश व्हावा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख श्री. सुरेश कुडेकर, उपतालुकाप्रमुख श्री. राजाराम तिलटकर, शहरप्रमुख श्री. विशाल बाळकृष्ण सायकर, युवासेना तालुका अधिकारी श्री. कौस्तुभ करडे, उपविभाग अधिकारी श्री. अजय पेरवी, विभाग अधिकारी श्री. कल्पेश पेरवी, तालुका संघटक श्री. कृष्णा म्हात्रे, शाखाप्रमुख श्री. दामोदर कांबळे, उपशहरप्रमुख दीपल शिर्के, महिला आघाडीच्या सौ. निशा पाटील, तसेच इतर शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी एकत्र येत म्हसळा पोलीस ठाण्यात मा. पोलीस अधीक्षक साहेब आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. अशा क्रूर दहशतवाद्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांना न्याय मिळायला हवा.”
या आंदोलनातून सर्व धर्मीय नागरिकांच्या भावना व्यक्त झाल्या आणि केंद्र सरकारने दहशतवाद विरोधात अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.