माणच्या पाणी प्रश्नावर म्हसवड मध्ये शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा;
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी) –
माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे, वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ पद्धतीने समान जलवाटप व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज म्हसवड येथे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला.
या मोर्चाची सुरुवात म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. पुढे मोर्चाने शिवाजी चौक, बाजारपेठ, सरकारी दवाखाना, एसटी स्टँड मार्गे मार्गक्रमण करत अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर आणि चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना महेश करचे म्हणाले, “आम्हाला वर्षभरापासून एकही आवर्तन मिळालेले नाही. शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश सुरू असताना, आम्ही प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, पाणी मिळण्याऐवजी धमक्या मिळत आहेत.
मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून जमावबंदी लागू करण्यात आली होती, तसेच आंदोलन रोखण्यासाठी मोठा दबावही आणण्यात आला. तरीही शेतकरी रस्त्यावर उतरले आणि आपला आवाज बुलंद केला. करचे यांनी पुढे सांगितले की, “आमचा लढा न्यायाचा आहे. येत्या दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत.”