“बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाच्या दहा वर्षांच्या पूर्णत्वाच्या निमित्ताने दहिवडी पोलीस ठाण्यामार्फत भव्य जनजागृती बाईक रॅली

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी, ता. ७ (प्रतिनिधी)
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत दहिवडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार, पोलीस भरती अकॅडमीच्या विद्यार्थिनी, तसेच शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी स्फूर्तीदायक वातावरणात “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानाच्या अनुषंगाने जनतेमध्ये जनजागृती केली. फ्लेक्स, बॅनर आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा तसेच महिला सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

ही रॅली दहिवडी पोलीस ठाण्याच्या आवारातून सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गांवरून जात पुन्हा पोलीस ठाण्यात आली. यामध्ये महिलांनी “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा,” “स्त्री शिक्षण हा समाजाचा आधार,” “महिला सशक्तीकरण हीच खरी प्रगती” अशा घोषणा देत लोकांमध्ये जनजागृती केली.

रॅलीदरम्यान नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी रॅलीला प्रोत्साहन देत टाळ्यांचा गजर केला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.

या उपक्रमाची संपूर्ण कार्यवाही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी महिला पोलीस अंमलदारांसह रॅलीचे नेतृत्व केले.

रॅलीदरम्यान अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत “बेटी बचाओ, बेटी पढाओ” योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. अनेकांनी मुलींच्या शिक्षणासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

सहभागी विद्यार्थिनींनी देखील महिलांच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचा आणि शिक्षणास सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

पोलीस प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारच्या उपक्रमांना अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या अधिकारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” ही केवळ योजना नसून, ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ बनावी, यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सपोनि अक्षय सोनवणे यांनी केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!