धनगर समाजाच्या उपोषणाला राष्ट्रवादी पक्षाचा पाठींबा ; या समाजाचा प्रश्न थेट विधानसभेत मांडणार: आ. जयंत पाटील
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी –
धनगर समाजाला घटनेने दिलेले एस.टी. चे आरक्षण मिळावे यासाठी या समाजाच्या तरुणांनी गेले ११ दिवसांपासुन म्हसवड नगरपरिषदे समोर आमरण उपोषण सुरु केले आहे या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील याठिकाणी आले असता त्यांनी धनगर समाजाच्या या उपोषणाला राष्ट्रवादी पक्षाचा पाठींबा असल्याचे सांगत या समाजाचा प्रश्न थेट विधानसभेत मांडणार असल्याचे स्पष्ट केले.
धनगर समाजाला एस.टी. चे आरक्षण हे राज्य घटनेने दिलेले आहे, मात्र राज्य शासन ते आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे, घटनेने जे आरक्षण दिले आहे त्यामध्ये धनगड असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे, वास्तविक राज्यात सर्वत्र धनगर अस्तित्वात आहेत धनगड ही जमात कोठेही आढळुन आलेली नाही त्यामुळे धनगर व धनगड ही एकच जमात असल्याचे गृहीत धरून त्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे करावयाची आहे मात्र ही शिफारस करण्यासाठी राज्य सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप धनगर समाजा कडुन करण्यात येत असुन राज्य सरकार ने ही शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजाच्या उत्तम वीरकर, गणेश केसकर, प्रकाश हुलवान या तीन युवकांनी म्हसवड येथे गत ११ दिवसांपासुन आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाला आजवर अनेक राजकीय मान्यवरांनी व सामाजिक संघटनांनी आपला पाठींबा दर्शिवला आहे.
आजवर धनगर समाजाची फक्त दिशाभुल करण्यात आली असल्याचे यावेळी आ. जयंत पाटील यांनी सांगितले तर आपण धनगर समाजाचा प्रश्न मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालून विधानसभेतही मांडणार असल्याचे स्पष्ट करताना आ. पाटील म्हणाले की निवडणुका जवळ आल्या की सत्ताधार्यांना धनगर समाज आठवतो, मात्र या समाजाच्या अडी अडचणी कधीच सोडवल्या गेल्या नाहीत याबाबत आपण पक्षश्रेष्ठी असलेले पवार साहेब यांच्याशी चर्चा करणार असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत धनगर समाजाचे प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.
यावेळी धनगर समाजाच्या वतीने याबाबत थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच साद घालण्यात आली, जोवर पवार साहेब यात लक्ष घालत नाहीत तोवर आमच्या आंदोलनाकडे शासन लक्ष देणार नाही असे म्हणत आता पवार साहेबांनीच याठिकाणी भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माण-खटाव राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, प्रा. कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अभयसिंह जगताप, जयसिंह राजेमाने, परेश व्होरा, चंद्रकांत केवटे, काशिनाथ रुपनवर आदी उपस्थित होते.
लोकं आंदोलनाला बसतात त्याची दखल सरकारने घेणे गरजेचे असताना मात्र दखल घेतात ते चांगल्या सरकारचे लक्षण असते.मात्र सध्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातुन सरकारमधील मंत्री राज्यातील विविध तालुक्यात येऊन भाषणे देण्यापलीकडे काही केले नाही. राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करु, पाठिंबा सहानुभूती आहे, तुम्ही जिवाची बाजी लावून लढत आहात धनगर बांधवांची गाऱ्हाणी राज्य सरकार मांडू असा शब्द ही यावेळी दिला.
चौकट – धनगर समाजाकडुन दररोज विविध आंदोलने करण्याचा निर्धार –
म्हसवड येथे सुरु असलेल्या आमरण उपोषण ला पाठींबा म्हणुन आता धनगर समाजाने दररोज विविध गावांमध्ये आंदोलनाची साखळी निर्माण करण्याचा निर्धार केला असुन ही आंदोलने लक्षवेधी करण्याचे निश्चीत केले आहे. म्हसवड शहरात सुरु असलेल्या या आंदोलनाची धग आता विधानसभेत पोहचवायची आहे असा दृडनिश्चय यावेळी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला.