मंत्री जयकुमार गोरे यांनी कराड तालुक्यात ४,८७६ घरकुलांना दिली मंजुरी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
उंब्रज, ता. कराड:
महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी घरोघर आनंदाची बातमी आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रासाठी २० लाख घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जलदगतीने काम करत ४५ दिवसांतच ही उद्दिष्टपूर्ती केली.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये जमा करण्यात आले. कराड तालुक्यात एकूण ४,८७६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी सांगितले की, कराड तालुक्याच्या ८५% उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी दीपाली ताई खोत यांनी गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांचे अभिनंदन केले. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना व नरेगा अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा लाभ अधिकाधिक गरजू कुटुंबांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले, तसेच भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी मोलाची भूमिका बजावली.
“घरकुल योजनेमुळे अनेक वर्षे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या कुटुंबांचे स्वप्न साकार होईल. या दिवाळीत अनेकांना त्यांच्या हक्काच्या घरात सण साजरा करता येईल,” असे प्रताप पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरचिटणीस रघुनाथ शेडगे, सरचिटणीस किसान मोर्चा भाजपा पुरंदर जाधव, बूथ अध्यक्ष राजेंद्र लोहार, प्रदीप सावंत, महेंद्र बानुगडे, संजय गिरिगोसावी, सचिन पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.