म्हसवडचा अर्धवट रस्ता – विकासाचे स्वप्न की जनतेचे दु:स्वप्न?
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी – म्हसवड
शहराचा महत्त्वाचा दुवा असलेला म्हसवड चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्ता सध्या अक्षरश: धोक्याचा मार्ग ठरत आहे. अत्यंत वर्दळीचा आणि पोलिस स्टेशन, शैक्षणिक संस्था व निवासी भागांना जोडणारा हा रस्ता सध्या खड्डे, चिखल आणि खोदकामाने विद्रूप झाला आहे. परिणामी नागरिकांसह प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
म्हसवड नगरपालिकेच्या हद्दीतील शिक्षक कॉलनी परिसर नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा मोठा भाग पुरवणारा असून, हा परिसर शैक्षणिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जातो. या भागात दररोज हजारोंची वर्दळ असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर सुरू असलेले काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले आहे. 20 एप्रिलनंतर खडीकरण झाल्यावर काम ठप्प झाले आणि आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
कामाच्या अर्धवटतेचे कारण विचारल्यास नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. दोघांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे सध्या जनतेला रोजच्या रोज त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, अपघात, वाहनांचे नुकसान, तसेच पोलीस स्टेशनला जाणाऱ्यांची अडचण वाढली आहे.
विकासाच्या नावाखाली सुरू झालेल्या या कामाने स्थानिक नागरिकांचा संयमाचा बांध फुटला असून, आता प्रश्न विचारला जातोय – “या अर्धवट रस्त्याच्या चित्तरकथेला जबाबदार कोण?”
“राजकारण बाजूला ठेवा, आधी रस्त्याचे काम पूर्ण करा,” असा थेट इशारा आता नागरिक देत आहेत. प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त करत विचारले आहे – “या कामावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा आहे का?”
पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर या रस्त्याचे काम थांबणे ही शहरासाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे, ही जनतेची ठाम मागणी आहे.