म्हसवड पोलिसांची अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई: लाखो रुपयांची देशी-विदेशी व ताडी, हातभट्टीची दारू जप्त; आरोपींची अटक
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सचिन मंगरुळे (प्रतिनिधी )
म्हसवड, ता. ५ एप्रिल –
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखो रुपयांची देशी, विदेशी, ताडी व हातभट्टीची दारू जप्त केली असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने केली आहे.
पहिल्या कारवाईत पोलिसांना मौजे हिंगणी (ता. माण) गावात आरोपी तातोबा लक्ष्मण सरतापे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ताडी व हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला छापा टाकला. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर ताडी व हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत दहिवडी ते म्हसवड रोडवर पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एक संशयास्पद व्यक्ती मोटरसायकलवर अवैधरीत्या दारू वाहतूक करताना पाहिला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, मात्र तो न थांबता पळू लागला. यानंतर पोलिसांनी त्याचा सुमारे ५ किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले.
पकडलेल्या इसमाने आपले नाव पोपट पांडुरंग शिंदे (रा. पानवण, ता. माण, जि. सातारा) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. अंदाजे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
1. अमर नारनवर,2. मैना हांगे,3. सुरेश हांगे
4. नितीन निकम,5. संजय आस्वले,6. अनिल वाघमोडे,7. नवनाथ शिरकुळे,8. वसीम मुलानी
9. संतोष काळे
अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी म्हसवड पोलिसांचे हे पाऊल निश्चितच स्तुत्य असून, या कारवाईमुळे अवैध धंद्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून, अशा प्रकारच्या कारवायांमुळे गावांतील कायदा व सुव्यवस्थेचा स्तर उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.