“चला बालमित्रांनो विचाराचं झाड लावूया!” — डॉ. निकिता सोनावले यांचा बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेरणादायी उपक्रम
व्हिजन २४ तास न्यूज संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील वाठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. निकिता सोनावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नागझरी येथील आश्रमशाळेत एक आगळावेगळा व प्रेरणादायी उपक्रम राबवला. “चला बालमित्रांनो विचाराचं झाड लावूया!” या संकल्पनेतून त्यांनी मुलांमध्ये चिंतन, जिज्ञासा आणि वैचारिक समृद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांवर सोशल मीडियाचा अतिवापर आणि मोबाईलमधील अति गुंतवणूक यामुळे अभ्यास, विचारशक्ती आणि संवाद क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर सोनावले यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय बालपणाचा दाखला देत, मुलांना प्रेरित केले. त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी लहानपणापासूनच विपरीत परिस्थितीचा सामना करत शिक्षणासाठी झगडले. त्यांनी पोटाला चिमटा देत पुस्तकं खरेदी केली आणि आज आपल्याला मिळालेले संविधान हे त्यांच्या त्यागाचे मूर्त स्वरूप आहे.”
या उपक्रमात ‘बबलूची डायरी – बालपण हरवलं’ या विषयावरही विशेष चर्चा झाली. यामध्ये मुलांचं हरवत चाललेलं बालपण, संवादाचा अभाव, मानसिक ताण, आणि वाढते आरोग्यविषयक प्रश्न यावर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. सोनावले यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आज मुलांमध्ये वाचन कमी होत चालले आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक विकास आणि जीवनदृष्टी खुंटत आहे. अशावेळी पुस्तक हेच खरे मित्र ठरू शकते.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तकं, डायऱ्या, पेन आणि पाव यांचे वाटप करण्यात आले. उपस्थित मुलांनी आनंदाने या भेटवस्तू स्वीकारल्या आणि ‘विचाराचं झाड’ लावण्याच्या संकल्पात भाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक येवले सर, घाडगे सर, रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या सौ. सुनंदा सोनावले, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, मुलांच्या मनात विचारांचे बीज पेरणारा एक सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचा भाग ठरला आहे. “आजच्या मुलांना विचार देणं, ही काळाची गरज आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.